भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित 'कथा कीर्तन महोत्सव' ला चांगला प्रतिसाद
पुणे : भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित 'कथा कीर्तन महोत्सव' मध्ये दुसऱ्या दिवशी मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी ,सायंकाळी ६ वाजता देहू येथील ह .भ. प. आचार्य वैभव महाराज राक्षे यांच्या पारंपरिक वारकरी कीर्तन(भक्त प्रल्हाद कथा ) ला चांगला प्रतिसाद मिळाला .भक्त प्रल्हाद विषयावरील कथा कीर्तनातून जणू भक्तीचा मळा फुलला !
महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कथा कीर्तन महोत्सवात हे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नागलक्ष्मी राव, पुण्यभूषण फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी सूत्रसंचालन केले.
'कीर्तन हा आनंदाचा भाग असायचा. पुण्यातही आफळेबुवा, निजामपुरकर बुवा अशा दिग्गजांची कीर्तन परंपरा होती.या परंपरेचे पुढचे पाऊल येथे कीर्तन महोत्सवा मुळे पडले आहे.ही सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम भारतीय विद्या भवन द्वारे होत आहे', असे उद्गार पुण्यभूषण फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी यावेळी बोलताना काढले.
ह.भ.प.वैभव महाराज राक्षे यांनी 'रूप पाहता लोचनी', 'जय जय राम कृष्ण हरी', 'परम अमृते रसना ओलावली,अशा अनेक पारंपारिक रचना सादर केल्या.
तुकाराम महाराज यांच्या परमामृत अभंगाच्या चार चरणाचे विवेचन त्यांनी केले. 'अमृताने मनुष्य अमर होतो, हा परिणाम इतर कशाला येणे शक्य नाही.ज्यामुळे आपल्या प्राणाची धारणा होते, जग तरून जाते, ते परब्रह्मतत्व हेच अमृत आहे. भगवंताच्या नामामृताने इतर सर्व अमृताची प्राप्ती होणार आहे. त्याची आस बाळगली पाहिजे', असे विवेचन त्यांनी केले.
Reviewed by ANN news network
on
११/२८/२०२३ ०८:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: