पुणे पीजन मित्र नॅशनल असोसिएशनतर्फे कबुतर स्पर्धेचे वार्षिक पारितोषिक वितरण
पुणे: 'कबुतर पाळणाऱ्या समूहाच्या पीजन मित्र नॅशनल असोसिएशन या देशपातळीवरील एकमेव संस्थेच्या पुणे शाखेतर्फे कबुतरांची उडण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे वार्षिक पारितोषिक वितरण २०२२-२३ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता. २०) कॅंप, पुणे येथे करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष व्ही. सत्या (चेन्नई)हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चेन्नई येथील इनकम टॅक्स विभागाचे अरुण कुमार, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सल्लागार अली दारूवाला,भाजपचे पुणे संघटन सरचिटणीस गणेश घोष, संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव, उपाध्यक्ष शशिकांत बालवडकर, सचिव सलीम शेख उपस्थित होते. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सल्लागारपदी नेमणूक झाल्यानिमित्त कार्यक्रमाचे संयोजक अली दारूवाला यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 'कबुतरांच्या या स्पर्धेला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे,त्याचा पाठपुरावा करू " असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे नवनियुक्त सल्लागार अली दारूवाला यांनी यावेळी बोलताना केले.
२७५ किमीच्या पुणे- जालना या अंतराच्या कबुतर उडणे स्पर्धेत मुस्तफा पटेल यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. तर शैलेंद्र जाधव, सुनील अलकुंटे यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे पारितोषिक जिंकले. इतर गटातील विजेत्यांना देखील यावेळी पारितोषिके देण्यात आली.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष व्ही.सत्या म्हणाले, " देशभरात या स्पर्धेबाबत कुतूहल आहे. केरळ, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्रात अशा स्पर्धा होतात. हा पूर्णपणे एक खेळ आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून यासंबंधीच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात काही अडचणी आहेत, त्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत."
अरुण कुमार म्हणाले, '२०१० ला हा कबुतर शो सुरू केला. तीन वर्ष यश मिळाले नाही. पण मी हार मानली नाही. स्पर्धा लवकर सुरू करा. ही पूर्ण कायदेशीर स्पर्धा आहे. चांगले पक्षी गोळा करा. थोडे ठेवा. ते यश मिळवून देतील. धान्य सुकवून आणि धुवून स्वच्छ करून पक्षांना खाऊ घाला. किती किमीच्या स्पर्धेत कोणता पक्षी सहभागी करायचा हे पक्षी पालकाला (मालकाला) कळणे महत्वाचे आहे."गणेश घोष म्हणाले, "संघटना राष्ट्रीय स्तरावर काम करते, याचे कौतुक वाटते. या स्पर्धेत, तसेच संघटनेला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी भाजपचा प्रतिनिधी म्हणून प्रयत्न करू."
शैलेंद्र जाधव यांनी स्पर्धेची माहिती दिली. ते म्हणाले, " १५० ते १००० किमी च्या गटांमध्ये दोन फेऱ्यात ही स्पर्धा झाली . इतक्या प्रदीर्घ अंतरात पक्षी ठरलेल्या वेळेत जाऊन घरी परत येतात. ८०० पक्षी या स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेचा कालावधी दोन महिन्यांचा असतो. त्यात दर आठवड्याला एका गटातील स्पर्धा होते. पक्ष्यांच्या पायात विशिष्ट टॅग असतो. टॅग काढला की त्याद्वारे पक्षाने किती अंतर कापले, कोण जिंकले हे कळते."
Reviewed by ANN news network
on
५/२१/२०२३ ०२:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: