डॉ.दाभोलकर, गौरी लंकेश आदींच्या हत्यांचा तपास भरकटलेलाच! : डॉ. अमित थडाणी
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार पुरोगाम्यांच्या हत्या झाल्यानंतर या चारही प्रकरणात तपास यंत्रणांनी ज्या प्रकारे तपास केला, त्यात कुठेही ताळमेळ आणि तर्क दिसला नाही. उलट हा तपास भरकटला होता. ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ हे पुस्तक लिहिण्यासाठी शेकडो संदर्भ पडताळले आणि 10 हजारांहून अधिक पानांची आरोपपत्रे वाचली. या पुस्तकातून मी केवळ तपासातील सत्य मांडले आहे, कोणाची बाजू घेतली नाही, असे स्पष्ट मत डॉ. अमित थडानी यांनी केले. कोथरूड येथील अंबर हॉल येथे 5 मे या दिवशी डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून प्रतिथयश लेखिका शेफाली वैद्य आणि विशेष अतिथी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री.विद्याधर नारगोलकर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. या खटल्यांमध्ये हिंदू कार्यकर्त्यांची बाजू मांडणारे वकील ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर हेही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंजना थडानी यांनी केले.
डॉ. अमित थडानी पुढे म्हणाले, नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणात दर 2-3 वर्षांनी काही लोकांना पकडण्यात आले आणि तेच खुनी म्हणून सांगितले गेले. प्रत्येक वेळी त्यांना अडकवण्यासाठी प्रत्यक्ष साक्षीदार उभे करण्यात आले, प्रत्येक वेळी खुनी पालटले गेले, शस्त्रे पालटली गेली, शस्त्रांचे ‘फॉरेन्सिक लॅब’चे अहवाल वेगवेगळे होते. सत्य जाणण्यापेक्षा काही प्रसिद्धीमाध्यमांनीही ‘मिडिया ट्रायल’ करून तपास भरकटवण्यास हातभार लावला. याचा मोठा दुष्परिणाम या अन्वेषणावर झाला. हिंदुत्ववादी संघटनांच्या निष्पाप लोकांना अनेक वर्षे छळ करून कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे'.
अन्वेषण यंत्रणांनी आधीच हिंदुत्वनिष्ठांना दोषी ठरवून मग पुरावे शोधले :शेफाली वैद्य
डॉ. थडानी यांनी या पुस्तकासाठी जे परिश्रम घेतले आहेत त्याला तोड नाही. या चारही प्रकरणांत अन्वेषण यंत्रणांनी आधीच हिंदुत्वनिष्ठांना दोषी ठरवून मग पुरावे शोधले. अन्वेषण यंत्रणांनी तपासाचा उलटा प्रवास केला आहे. मात्र इतक्या वर्षांत यांतील एकाही हत्येच्या अंतिम निष्कर्षापर्यंत अन्वेषण यंत्रणा पोचू शकलेली नाही. पालघर मधील साधूंना दगडांनी ठेचून मारले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली. त्यांच्या हत्यांविषयी कुठेच गाजावाजा झाला नाही. त्यांना जगण्याचा, न्याय मिळण्याचा अधिकार नव्हता का? जर दाभोलकरांनी अंनिसचे कार्य केलेले चालते तर सनातन संस्थेला तिचे कार्य करण्याचा अधिकार नाही का? त्यामुळे हिंदूंनी सत्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे. हे पुस्तक फक्त इंग्रजीत न प्रकाशित करता हिंदी आणि मराठीतही प्रकाशित करायला हवे.
हे पुस्तक प्रश्न विचारण्याची हिंमत देते ! : ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर
डॉ. थडानी यांनी हत्यांच्या तपासात बऱ्याच चुकीच्या बाबी तपासयंत्रणाकडून झाल्या आहेत हे मांडले आहे, त्यावर प्रश्न विचारण्याची हिंमत या पुस्तकाचे लेखकांनी दाखवलीआहे, गुजरात दंगली, मालेगाव स्फोट खटला अशा अनेक प्रकरणांत प्रश्न विचारले जावेत.
Reviewed by ANN news network
on
५/०६/२०२३ १२:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: