पिंपरी, दि. २१ मे २०२६ :"आजच्या काळात जिवंत, चालत्या-बोलत्या माणसाला पाण्यासाठी ताटकळत उभे केले जाते, मात्र निर्जीव दगडाच्या देवावर अडीच-अडीच लीटर दूध-दही ओतले जाते. माणसांपेक्षा दगडांना जास्त महत्त्व देणारा समाज वाढू लागल्याने खऱ्या वारकरी विचारांचा पराजय होत आहे," असे रोकडे प्रतिपादन प्रसिद्ध प्रबोधनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांनी केले. माणसाला माणूस म्हणून जगू देणे, समता, शांती, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणे हाच संतांचा, तथागत बुद्धांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ विचार होता, असेही ते म्हणाले. पिंपरी येथील विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीत सम्यक स्वयंसेवा संस्थेच्या वतीने आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाप्रसंगी (दि. १९ मे रोजी) मुख्य कीर्तनकार म्हणून ते बोलत होते.
महाराष्ट्राची वैचारिक परंपरा आणि महापुरुषांचे विचार
कीर्तनादरम्यान बोलताना वाबळे महाराजांनी महाराष्ट्राच्या समृद्ध वैचारिक परंपरेचे धागेदोरे उलगडले. ते म्हणाले की, महात्मा फुले हे जगद्गुरु तुकोबारायांच्या वाटेवरून गेले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुल्यांच्या विचारांच्या वाटेवरून चालले. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनीही तुकोबारायांच्या विचारांचा वारसा जपत परकीय शाह्यांचा पाडाव केला आणि बहुजन, कुणबी समाजाला स्वराज्य मिळवून दिले. संत ज्ञानेश्वरांनी वेदांवर भाष्य न लिहिता गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिली, कारण गीता त्यांना तथागत गौतम बुद्धांच्या धम्मपदासारखी वाटली. ज्ञानेश्वरीने समाजाला अहंकार आणि क्रोधापासून दूर राहून समता शिकवली. "तु मन हे मीचि करी, माझिये भजनीं प्रेम धरी" या ओवीचा अर्थ सांगताना 'भजन' म्हणजे केवळ टाळ वाजवणे नसून समाजाची 'सेवा' करणे हाच खरा अर्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आचरण शुद्धता हाच खरा परमार्थ
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र्याचा दाखला देत महाराज म्हणाले की, बाबासाहेब विलायतला गेले पण कधी तंबाखू, पानाच्या व्यसनाला शिवले नाही. त्यांचे आचरण शुद्ध होते म्हणूनच समाज सुधारला. ज्याचे आचरण शुद्ध नाही, त्याचा परमार्थ, राजकारण किंवा समाजकारण काहीच शुद्ध असू शकत नाही. जे पंचशीलाचे पालन करतात, तेच खरे धम्माचे लोक आहेत आणि तेच खरे वारकरी आहेत. देव दगडात, मूर्तीत किंवा तीर्थात नसून तो माणसाच्या सत्य आचरणात आणि चांगल्या चरित्रात असतो. संत नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये जाऊन शीख बांधवांना जोडण्याचे काम केले आणि 'गुरु ग्रंथ साहिब'मध्ये स्थान मिळवले. वारकरी संप्रदाय हा समाज जोडणारा आहे, तोडणारा नाही, हा संदेश त्यांनी दिला.
जातीभेद जाणवल्याने संघ सोडला - मारुती भापकर
या सोहळ्यात आपले मत मांडताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी एक मोठा खुलासा केला. "मी पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) काम केले होते. परंतु जेव्हा मला तिथे जातीभेद जाणवला, तेव्हा मी त्यातून बाहेर पडलो. चळवळीमध्ये सामील होऊन समाज हितासाठी काम करू लागलो. हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम नक्कीच समाजाला नवी आणि प्रगतीशील दिशा देणारा ठरेल," असे भापकर म्हणाले.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि मोठी उपस्थिती
या सोहळ्यादरम्यान सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या राईबाई वाघमारे, मस्के मामी, रानुबाई किसन डोंगरे, शिलाबाई अभिमान सोनवणे, मंदा वाळके, आशावर्कर मिराताई वाघमारे आणि सुवर्णा कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नेटके आयोजन सम्यक स्वयंसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ बनसोडे, ललिता बनसोडे, सिद्धांत बनसोडे, ज्योती बनसोडे आणि कौसल्या पंडित यांनी केले होते.
या प्रसंगी माजी नगरसेवक राहुल भोसले, माजी नगरसेविका वैशाली घोडेकर (लोंढे), पत्रकार नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, गोपाल मोटघरे, बाबू कांबळे, प्रविण शिर्के, रोहित खरगे, अविनाश कांबीकर, माऊली भोसले, मुख्याध्यापक आल्हाट यांच्यासह स्वप्नरूपी, आयुष्य, सम्राट, ममता, आदिती, तनिष्का, खुशी, भिमाई, रमाई, सावित्री आणि गौतमी महिला बचत गटांच्या शेकडो महिला व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Labels
Pimpri News, Wabhale Maharaj Kirtan, Samyak Swayamsevak Sanstha, Maruti Bhapkar Speech, Pimpri Chinchwad Jayanti Utsav, Warkari Sampraday Equality, Social Reformers Pimpri
Search Description
Prabhodhankar Dnyaneshwar Mauli Wabhale Maharaj slammed superstitious practices and emphasized equality during a joint Jayanti festival organized by Samyak Swayamsevak Sanstha in Vitthalnagar, Pimpri.
Hashtags
#PimpriNews #WabhaleMaharaj #MarutiBhapkar #AmbedkarJayanti #PhuleJayanti #BuddhaDhamma #WarkariSampraday #SocialEquality
Reviewed by ANN news network
on
५/२१/२०२६ ०९:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: