बाळासाहेबांनी विरोध केलेल्या काँग्रेसशीच राऊतांची आघाडी: नवनाथ बन
पहलगाम हल्ल्याबाबत माफी मागा; निवडणुक आयोगावर संशय असल्यास राजीनामा द्या
राजभवनाचा गैरवापर झाला होता का? पवारांनी उत्तर द्यावे, भाजपचे आव्हान
मुंबई, (प्रतिनिधी): पाकिस्तानने भारतात दहशतवादी हल्ले घडवूनही काँग्रेस सरकारने पाकिस्तानला भारतात खेळण्यास आमंत्रित केले होते. याच काँग्रेसच्या निर्णयामुळे १९९१ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडली होती, याचा सोईस्कर विसर खासदार संजय राऊत यांना पडला आहे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी लगावला. औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते श्री. राऊत यांना स्मृतीभ्रंशाचा झटका आल्याचे ते म्हणाले.
भारत-पाक क्रिकेट सामन्याबाबत भाजप आणि मोदी सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानच्या भूमीवर किंवा पाकचे क्रिकेटपटू भारतीय भूमीवर खेळणार नाहीत. “खेळ आणि रक्त आम्ही एकत्र आणत नाही,” असे श्री. बन यांनी स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुखांनी विरोध केलेल्या काँग्रेसशी आघाडी करताना राऊतांनी हा इतिहास विसरू नये, असे त्यांनी सांगितले. तसेच, आपल्याला देशभक्ती कळते असा आव आणून पंतप्रधान मोदींवर टीका करू नये, असेही त्यांनी नमूद केले.
संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी जिवंत असल्याचा दावा करून भारतीय सैन्याचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी, या मागणीचा पुनरुच्चारही श्री. बन यांनी केला. राऊत यांना निवडणूक आयोगावर संशय असल्यास त्यांनी त्यांच्या खासदारांना राजीनामा देण्यास सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
यावेळी नवनाथ बन यांनी राजभवनाच्या कथित गैरवापरावरून शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. झारखंडचे मुख्यमंत्री मधु कोडा यांना अटक झाली, तेव्हा के. शंकर नारायणन राज्यपाल होते. तेव्हा राजभवनाचा गैरवापर झाला नव्हता का, असा सवाल त्यांनी विचारला. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि श्री. पवार त्या सरकारमध्ये मंत्री होते. याच शंकर नारायणन यांची पुन्हा महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.
Navnath Ban
Sanjay Raut
BJP
Shiv Sena
India-Pakistan Cricket
#NavnathBan #SanjayRaut #BJP #MaharashtraPolitics #IndiaPakCricket #DevendraFadnavis

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: