पंढरपूर, ३ जुलै २०२५: वारकरी संप्रदायाच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात, वारकऱ्यांचे संघटन आणि त्यांच्या विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एकादशीला (६ जुलै) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी याबाबत माहिती दिली.
प्रतिवर्षी लक्षावधी वारकरी आषाढी, कार्तिकीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. 'लोचनात त्रिभुवन अवघे लेकरांस गवसून जाय माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय' असे म्हणत वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूर येथे विसावत आहेत. वारकरी संप्रदायाचे धर्मकार्य आणि राष्ट्रनिष्ठा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. गेली अनेक शतके वारकरी संप्रदाय नैतिक मूल्ये, संस्कृतीरक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आला आहे. आजच्या काळातही धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांच्या हितासाठी वारकरी समाज अग्रभागी आहे.
महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असूनही अद्याप पंढरपूर आणि आळंदी येथील तीर्थक्षेत्रांना म्हणाव्या अशा सुविधा नाहीत. याचसोबत आळंदी येथे प्रस्तावित असलेला कत्तलखाना, वारीत होणारी घुसखोरी, संतांच्या श्लोकांचा चुकीचा अर्थ लावून लोकांची दिशाभूल करणे यांसह अन्य प्रश्नांना वाचा फोडणे, तसेच जाज्वल्य भक्ती आणि राष्ट्रनिष्ठा यांच्या भूमिकेतून, वारकरी ऐक्य साधून महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे कराव्यात, यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे.
अधिवेशनाचे ठिकाण आणि प्रमुख उपस्थिती
हे अधिवेशन सद्गुरू श्री गंगागिरी महाराज मठ, भक्तीमार्ग, जनकल्याण हॉस्पिटलच्या शेजारी, पंढरपूर येथे दुपारी १ ते ३.३० या वेळेत घेण्यात येणार आहे.
या अधिवेशनाचे अध्यक्ष महंत रामगिरी महाराज असणार आहेत. या अधिवेशनात ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष रामेश्वरशास्त्री महाराज आणि सचिव नरहरी महाराज चौधरी, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्वस्तप्रकाश महाराज जवंजाळ, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ,छोटे कदम माऊली, नरेंद्र महाराज मस्के, श्रीक्षेत्र अपेगाव येथील विष्णु महाराज अपेगावकर, अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे कोकण प्रांताध्यक्ष भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचेमारुती महाराज तुनतुने आणि कार्याध्यक्ष बापू महाराज रावकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे राज्य संघटक सुनील घनवट यांसह अनेक संत-महंत, ह.भ.प., धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
या अधिवेशनात धर्मरक्षणार्थ कार्यरत धर्मरक्षकांचा सन्मानही करण्यात येणार आहे. तरी या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने वारकरी-भाविक यांनी उपस्थित राहावे, तसेच अधिक माहितीसाठी राजन बुणगे - ९७६२७२१३०४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिवेशनातील प्रमुख विषय आणि मागण्या
अधिवेशनात खालील वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन केले जाणार आहे:
तीर्थक्षेत्रांची पवित्रता: पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांस यांपासून मुक्त करावीत, तसेच या सर्व तीर्थक्षेत्री १० किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर बंदी आणावी.
ईशनिंदा प्रतिबंधक कायदा: संत, संत-वाङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा.
वारीतील वातावरण: संतांच्या श्लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणाऱ्यांना शासनाने कायमचा प्रतिबंध करावा.
गोहत्या आणि गोतस्करी: गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्रातील गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी.
'लव्ह जिहाद' विरोधी कायदा: हिंदु युवतींचे रक्षण होण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा तात्काळ संमत करावा.
नदी प्रदूषण: इंद्रायणी आणि चंद्रभागा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
Warkari Mahadhiveshan, Pandharpur, Hindu Janajagruti Samiti, Religious Conference, Sant Parampara, Cultural Preservation, Social Issues, Legislative Demands
#Warkari #Pandharpur #Mahadhiveshan #HinduJanajagrutiSamiti #ReligiousConference #Maharashtra #CultureProtection #LoveJihad #Goseva

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: