आमदार रासनेंच्या लक्षवेधीने साधले निकालाचे 'लक्ष्य'; एमपीएससी गट 'क' लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
विधानसभेत मुद्दा मांडल्यानंतर अवघ्या काही तासांत विद्यार्थ्यांच्या पदरी आनंद
मुंबई/पुणे, दि. ११ जुलै २०२५: कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट 'क' लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या या ७००० पदांच्या परीक्षेचा निकाल अवघ्या काही तासांत प्रसिद्ध झाल्याने राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी आनंद व्यक्त केला आहे.
आमदार रासनेंनी साधले 'लक्ष्य':
शुक्रवारी आमदार हेमंत रासने यांनी एमपीएससीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परीक्षांचे निकाल वेळेत लागत नाहीत, पात्रता यादी वेळेत जाहीर होत नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होते, असे त्यांनी निदर्शनास आणले. MPSC ला निकालासाठी बंधनकारक कालमर्यादा द्यावी, उत्तरदायित्व निश्चित करणारी स्वतंत्र समिती किंवा लोकपाल नेमावा, विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्र व कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र स्थापन करावे, तसेच UPSC प्रमाणे ‘MPSC प्रतिभा सेतु’ उपक्रम सुरू करावा, अशी मागणी त्यांनी विधानसभा सभागृहात केली होती.
मंत्र्यांचे आश्वासन अन् तात्काळ कार्यवाही:
यावेळी राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी उत्तर देताना सांगितले होते की, न्यायालयाने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे नुकतेच सांगितले असून, निकालाची प्रत येताच परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर शासन यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि गट 'क' लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
दरम्यान, मंत्री शेलार यांनी असेही सांगितले की, "MPSC ही स्वतंत्र संस्था आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिजनमधील '१५० दिवस सेवा सुधार कार्यक्रम' राबवला जात आहे, यामध्ये MPSC संदर्भातील सुधारणा, निकालातील विलंब, भरती प्रक्रियेतील त्रुटी यांचा समावेश आहे. त्यामुळे रासने यांच्या मागण्यांनुसार सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल." या तात्काळ निकाल जाहीर झाल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: