मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनने दमदार आगमन केले असून, पालघर जिल्ह्यासह नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात भारतीय हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. तर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्हा तसेच साताऱ्याच्या घाट परिसरासाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे शहरातही जोरदार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले आहे. दुपारी एक वाजता खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या पावसामुळे आणि धरणातील पाण्याची आवक वाढल्यामुळे इंद्रायणी नदीपात्रात कोणत्याही क्षणी विसर्ग चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना आणि विशेषतः वारकऱ्यांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.
रायगड जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सावित्री, पाताळगंगा, अंबा, उल्हास या नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. कुंडलिका नदीने तर इशारा पातळी ओलांडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून अधूनमधून जोरदार वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातिल सुलवाडे बॅरेजच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बॅरेजच्या मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडून तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एकंदरीत, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून, प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Rains, Monsoon Alert, Red Alert, Orange Alert, Flood Warning, Disaster Management
#MaharashtraRains #Monsoon2025 #RedAlert #MumbaiRain #FloodWarning #PuneRain
Reviewed by ANN news network
on
६/२०/२०२५ ०६:४१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: