ए एन एन न्यूज
नेटवर्क दिनांक ०३ जून २०२५ चे बातमीपत्र
नमस्कार! ए एन एन न्यूज नेटवर्कमध्ये आपणा
सर्वांचे स्वागत. आता ऐकूया आजच्या बातम्या.
ठळक बातम्या:
- पिंपरी-चिंचवडमध्ये कमी उत्सर्जन क्षेत्रांसाठी ब्रिटिश उच्चायुक्त
आणि मनपाची संयुक्त कार्यशाळा.
- शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किसान सभेचे कोकण भवनवर धडक
आंदोलन.
- खालापूरमधील भारती अकॅडमी आणि सनशाइन इंटरनॅशनल शाळा
अनधिकृत.
- वारकऱ्यांसाठी सेवासुविधांमध्ये कमतरता नको: आयुक्त शेखर
सिंह यांचे निर्देश.
- उरणमध्ये पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्या
: खासदार श्रीरंग बारणे.
- माजी आमदार मनोहर भोईर यांनी उरणमधील २५ दिव्यांगांना
दिली आर्थिक मदत.
- सामान्य नागरिकांच्या समस्या स्थानिक स्तरावरच सुटायला
हव्यात: जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह.
आता पाहूया सविस्तर बातम्या:
पिंपरी चिंचवड शहरात हवेची गुणवत्ता
सुधारण्यासाठी महानगरपालिका आणि ब्रिटिश उच्चायुक्त तसेच ट्रान्सपोर्ट फॉर लंडन
यांच्या संयुक्त विद्यमाने कमी उत्सर्जन क्षेत्र योजनेवर आधारित पाच दिवसीय
कार्यशाळेचा शुभारंभ झाला. आयुक्त शेखर सिंह आणि ब्रिटिश उच्चायुक्त जेमी स्कॅटरगुड
यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले.
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नवी
मुंबईतील कोकण भवन येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.
शिष्टमंडळाने पुनर्वसन सहआयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले. रायगड आणि नवी
मुंबई परिसरातील जमिनी संपादनामुळे शेती उद्ध्वस्त झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
खालापूर तालुक्यातील भारती अकॅडमी आणि
सनशाइन इंटरनॅशनल या दोन शाळा अनधिकृत असल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले
आहे. पालकांनी या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण
विभागाने या दोन्ही शाळांना प्रत्येकी दहा लाख ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आषाढीवारी सोहळ्यासाठी वारकऱ्यांसाठी
पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, असे निर्देश
आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यांनी आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या
ठिकाणाची पाहणी केली.
खासदार श्रीरंग बारणे यांनी उरणमधील
अधिकाऱ्यांकडून पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. शहरात पाणी साचणार नाही याची
काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. नालेसफाईला गती द्यावी. उरण शहरात
समुद्राचे पाणी येणार नाही, याची काळजी घ्यावी. जेथे पाणी येते, त्याठिकाणी भराव टाकावा.
झाडांची छाटणी करावी. खराब झालेले विद्युत पोल दुरुस्त करावेत. पावसाळ्यात कोठेही पाणी
साचणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना बारणे यांनी केल्या
उरणचे
माजी आमदार मनोहर भोईर यांनी २५ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी २० हजार रुपयांची आर्थिक
मदत केली. दिव्यांगांना व्यवसायात मदत मिळावी, यासाठी ते दरवर्षी सहाय्य करतात.
यावेळी बोलताना भोईर यांनी उरण तालुक्यातील
नागरिकांना एकमेकांना मदत करण्याचे, गरीब व गरजूंची सेवा करण्याचे आणि एकजुटीने
समस्या सोडवण्याचे आवाहन केले.
रत्नागिरीचे
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारी स्थानिक
स्तरावरच सोडवण्याचे निर्देश दिले. त्यांनी प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला. लोकशाहीदिनाला अपर पोलीस अधीक्षक, निवासी
उपजिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, समाजकल्याण सहायक आयुक्त यांच्यासह अन्य अधिकारी
व कर्मचारी उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील प्रांताधिकारी आणि तहसीलदार
दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
बातमीपत्र संपले. नमस्कार!
------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #PimpriChinchwadCrime #MarathiNews #CrimeNews #WeaponSeizure #Murder #RoadAccident #HouseBurglary #OnlineFraud #PodcastNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: