पुणे, १६ जून २०२५: 'शाळा प्रवेशोत्सव २०२५' कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, आलेगाव पुनर्वसन येथे विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
आधुनिक व दर्जेदार शिक्षणासाठी शासन कटिबद्ध
यावेळी गट विकास अधिकारी महेश ढोके, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन, विस्तार अधिकारी शरीफा तांबोळी, केंद्र प्रमुख आशा धाडगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरधवल (बाबा) जगदाळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "भावी पिढी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासोबतच, सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे." त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि बूट उपलब्ध करून देण्यात येत असून, यासाठी राज्य शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचेही पवार यांनी नमूद केले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्या दृष्टीने अध्यापन केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे आवाहन
राज्य शासनाने १० कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे. यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांवर पर्यावरणविषयक संस्कार होण्यास मदत होईल आणि या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. पवार म्हणाले.
यावेळी अजित पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले.
- Education, School Reopening, Ajit Pawar, Deputy Chief Minister, Pune District, Daund, Zilla Parishad School, Student Welcome, Government Initiative, Environmental Awareness
- #AjitPawar #SchoolReopening #Education #Pune #Daund #MaharashtraGovernment #StudentWelcome #EnvironmentalEducation #ZPschool #MarathiNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: