ए एन एन न्यूज नेटवर्क बातमीपत्र दिनांक ३१ मे २०२५ (PODCAST)

 


ए एन एन न्यूज नेटवर्क

दिनांक ३१ मे २०२५

आजचे बातमीपत्र

ठळक बातम्या

'खजिन्याची शोधयात्रा' हे पुस्तक प्राचीन भारताच्या वैभवाची गाथा - मुख्यमंत्री

उद्योगमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री रोजगार योजनेत मोठे बदल

स्वारगेट पोलिसांकडून मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा उघडकीस; आरोपीला अटक

सिंधुदुर्गच्या विकासात सर्वांचे योगदान आवश्यक - पालकमंत्री नितेश राणे

लोणावळ्यात वलवण धरणात बुडून कासारवाडी येथील युवकाचा मृत्यू

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणावर बंदी

आता पाहूया सविस्तर बातम्या

'खजिन्याची शोधयात्रा' या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास आणि संस्कृती प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. त्यामुळे, हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या पुस्तकातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रशांत पोळ यांच्या 'खजिन्याची शोधयात्रा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह, मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उद्योगमंत्री  उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात (सीएमइजीपी) महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांमुळे आता इच्छुक उद्योजकांना दुहेरी फायदा होणार असून, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे या योजनेत पर्यटन आणि सेवा क्षेत्रातील अनेक नवीन उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. यात क्लाऊड किचन, जलक्रीडा, मासेमारी तसेच प्रवासी वाहतुकीसाठी बोट व्यवसाय यांचा समावेश करण्यात आल्याने जिल्ह्यातील तरुणांना आता विविध क्षेत्रांत उद्योजक बनण्याची संधी मिळणार आहे.

स्वारगेट पोलिसांनी मुकुंदनगर येथील सूर्यमुखी चंदनी आंबा माता मंदिरातील दानपेटीतून रोख रक्कम चोरणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. महादेव तुकाराम गिरमकर असे आरोपीचे नाव असून तो श्रीगोंदा तालुक्यातील कवठा विकास वाडीचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची ३८ हजार ४०० रुपयांची रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. २३ मे २०२५ रोजी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा तोडून दानपेटीतील रक्कम चोरली होती. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. साक्षरतेत राज्याच्या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्गचा समावेश आहे, तर दहावी आणि बारावीच्या निकालांमध्ये कोकण विभागात जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. प्रशासनातील अधिकारीही जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. सिंधुदुर्गला विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

जिल्ह्यातील बारावी (विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखा) आणि दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत कोकण विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुकास्तरीय शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, पोलिस अधीक्षक डॉ. मनोज दहिकर, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

लोणावळ्यामध्ये मित्रांसोबत फिरायला आलेल्या कासारवाडी, पुणे येथील निलेश शिंदे या १७ वर्षांच्या युवकाचा वलवण धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. निलेश त्याच्या १२ मित्रांसोबत लोणावळ्यात भ्रमंतीसाठी आला होता. हा गट वरसोली परिसरातून वलवण धरणाच्या मागील भागात गेला होता.धरणात पोहण्यासाठी उतरल्यावर तो पाण्यात बुडाला  घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र संस्थेचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने शोध मोहीम राबवली आणि अखेरीस निलेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश मिळवले.

 पुणे ग्रामीण जिल्ह्यात आता कोणत्याही खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट संस्था आणि छायाचित्रण व्यावसायिकांना ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करायचा असल्यास, त्याची पूर्व माहिती किमान सात दिवस अगोदर संबंधित पोलीस ठाण्याला देणे आणि तेथील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात अनेक महत्त्वाची धार्मिक स्थळे, मोठी धरणे आणि केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण संस्था आहेत. या ठिकाणी दहशतवादी कारवायांच्या उद्देशाने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी करून त्याचा वापर विध्वंसक कृत्यांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

बातमीपत्र संपले. धन्यवाद!


ए एन एन न्यूज नेटवर्क बातमीपत्र दिनांक ३१ मे २०२५ (PODCAST) ए एन एन न्यूज नेटवर्क  बातमीपत्र दिनांक ३१ मे २०२५ (PODCAST) Reviewed by ANN news network on ५/३१/२०२५ ०७:४३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".