सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. साक्षरतेत राज्याच्या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्गचा समावेश आहे, तर दहावी आणि बारावीच्या निकालांमध्ये कोकण विभागात जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. प्रशासनातील अधिकारीही जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. सिंधुदुर्गला विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
जिल्ह्यातील बारावी (विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखा) आणि दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत कोकण विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुकास्तरीय शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, पोलिस अधीक्षक डॉ. मनोज दहिकर, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले आहे. राज्य स्तरावरील मोहिमेत क्रमांक मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला, तेव्हाच मी ठरवले होते की, सिंधुदुर्गमधील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जिल्हावासीयांच्या वतीने सत्कार करायचा. तुम्ही चांगले काम करत असाल, तर पालकमंत्री म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे. जनतेचे सेवक म्हणून जिल्ह्यातील नागरिकांना चांगली सेवा द्या. चांगले काम करणाऱ्यांना मी नेहमीच शाबासकी देईन. तुम्ही आज चांगले काम कराल, तर आम्ही जिल्हावासीय तुमच्यासोबत आहोत."
"जनतेच्या हिताचे निर्णय घ्या, विविध क्षेत्रात नवनवीन प्रयोग करा. जगात आणि देशात जे चांगले आहे, ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणा. प्रशासनाच्या माध्यमातून चांगले काम करा, काहीतरी नवीन घडवा, प्रयत्न करा आणि जिल्ह्याला पुढे घेऊन जा. १५० दिवसांच्या कार्यक्रमात सिंधुदुर्गने पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवावे, अशी माझी अपेक्षा आहे. पुढील पाच वर्षांत जिल्ह्याला पुढे न्यायचे आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे," असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "सिंधुदुर्गच्या विकासात शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा आहे. खासदार राणे साहेबांनीही शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील शाळांचा स्तर उंचावला पाहिजे आणि दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. कोकणाच्या निकालात सिंधुदुर्ग प्रथम क्रमांकावर आहे. या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. पायाभूत सुविधा, शिक्षणासाठी चांगले वातावरण, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि जिल्ह्याची प्रतिमा सुधारणे यावर बारकाईने लक्ष दिले जात आहे. आज विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, तो त्यांच्यातील गुणांचा सत्कार आहे. तुम्ही दहावी-बारावीत चांगले गुण मिळवले आहेत. पुढेही चिकाटीने अभ्यास करा. दर्जेदार शिक्षणाची दालने उघडण्याचा विश्वास मी तुम्हाला आणि तुमच्या पालकांना देतो."
दहावीमध्ये मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमधील कु. आर्या अजित राणे, कु. श्रेयश चंद्रशेखर बर्वे आणि कुडाळ हायस्कूलमधील कु. चैतन्या रुपेश सावंत यांनी १०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. स्मितेश विनोद कडुलकर, रेश्मा पालव, विधी विरेंद्र चिंदरकर, ध्रुव आनंद तेंडुलकर आणि हर्षदा किसन हडलगेकर यांनी ९९.४० टक्के गुण मिळवून दुसरा, तर नक्षत्रा राजेंद्र काळे हिने ९९.२० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. बारावीच्या विज्ञान शाखेत जाधव अथर्व अतुल, तेंडुलकर मधुकर विवेक, पालव काशीराम विठोबा, कला शाखेत दळवी तनिषा विनय, कोकरे प्रियंका प्रकाश, मांजरेकर मानसी पांडुरंग आणि वाणिज्य शाखेत भोगटे आयुषी रुपेश, वाळुंजे चित्राली राजेश, परब तनुज निलेश यांचाही पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत कोकण विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांचा सत्कार करण्यात आला.
#Sindhudurg #NiteshRane #Education #DistrictDevelopment #MaharashtraNews #StudentAchievement #GovernmentOfficials #100DaysCampaign

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: