उरण लोकलसेवा समस्यांच्या गर्तेत; प्रवाशांची गैरसोय, फेऱ्या वाढवण्याची मागणी

विठ्ठल ममताबादे 

उरण - अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली उरण-नेरुळ आणि उरण-बेलापूर लोकल सेवा आता प्रवाशांसाठी समस्यांचे केंद्र बनली आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी उरणकरांच्या मागणीनुसार ही सेवा सुरू झाली, ज्यामुळे पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईसाठीचा प्रवास जलद झाला. उरणच्या औद्योगिक विकासामुळे नोकरवर्ग, विद्यार्थी आणि व्यावसायिकांची संख्या वाढली आहे आणि रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवासाला गती मिळाली आहे. मात्र, लोकल फेऱ्यांची संख्या अपुरी असल्याने उरणकरांची मोठी गैरसोय होत आहे.

प्रवाशांच्या मागणीनुसार, लोकलच्या फेऱ्या आता एका तासाऐवजी प्रत्येक १५ मिनिटाला असाव्यात. तसेच, उरण-सीएसटी आणि उरण-ठाणे लोकल सेवा तातडीने सुरू करण्याची गरज आहे. बेलापूर ते उरण रस्त्यावरील जीवघेणा मालवाहतुकीचा प्रवास टाळण्यासाठी सरकारने आणि रेल्वे बोर्डाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवाशांनी एकत्र येऊन केली आहे. प्रवाशांच्या वतीने डॉ. नितीन दिघे यांनी या मागणीचे नेतृत्व केले आहे.

हजारो महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नोकरवर्ग या लोकलने प्रवास करत आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तोडगा काढावा, अशी विनंती डॉ. नितीन दिघे यांनी सर्व प्रवाशांना एकत्र करून केली आहे.

उरण, बामन डोंगरी आणि खारकोपर या सर्व स्थानकांवरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, उरण-नेरुळ आणि उरण-बेलापूर लोकल प्रत्येक १५ मिनिटाला असणे अत्यावश्यक आहे. सर्वसामान्य नागरिक आणि नोकरदार वर्ग मुंबई-नवी मुंबईत घर घेऊ शकत नसल्यामुळे, त्यांनी उरण-नेरुळमधील विकसित होत असलेल्या नोड्समध्ये घरे घेतली आहेत. रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वी सरकार आणि बिल्डरांनी प्रवाशांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त फेऱ्या करण्याचे आश्वासन दिले होते, जे आता फोल ठरले आहे.

कामावर जाणे-येणे सोपे व्हावे म्हणून अनेक नोकरदारांनी कर्ज काढून उरण-नेरुळमध्ये घरे घेतली आहेत. मात्र, तासाला असणाऱ्या लोकल फेऱ्या त्यांच्या धावपळीच्या जीवनात अत्यंत त्रासदायक ठरत आहेत. याशिवाय, सकाळी ५ वाजल्यापासून आणि रात्री साडेनऊ नंतर लोकल नसल्यामुळे कामगार वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. दुसऱ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या किंवा रात्री उशिरा घरी येणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वेळेवर लोकल न मिळाल्यास बस किंवा रिक्षाने प्रवास करावा लागत असल्याने त्यांच्या खिशालाही भुर्दंड बसतो. बससाठी लांबच्या रांगेत उभे राहावे लागते, ज्यामुळे महिला प्रवाशांना गर्दीतून घरी जाण्यासाठी आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

अथक प्रयत्नानंतर लोकल सेवा सुरू झाली असली, तरी प्रचंड गर्दीमुळे सामान्य नोकरदार वर्ग आणि महिला वर्ग आपला बहुमूल्य वेळ प्रवासात घालवत आहेत. त्यामुळे कुटुंबाला वेळ देणेही त्यांना कठीण झाले आहे. या भागातील विद्यार्थ्यांना कॉलेज किंवा उच्च शिक्षणासाठी दररोज मुंबई-नवी मुंबई प्रवास करावा लागतो. उरणमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा नसल्याने रुग्णांनाही मुंबई किंवा नवी मुंबई गाठावी लागते. अशा परिस्थितीत, तासाला एक लोकल असल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना स्टेशनवर तासन् तास रेल्वेची वाट पाहावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, अनेक विद्यार्थ्यांनी मुंबईत पुढील शिक्षण घेणे बंद केले आहे. मुंबईची लोकल "जीवनदायिनी" मानली जाते, तर उरण रेल्वे सेवा प्रवाशांसाठी "त्रासदायिनी" ठरत आहे.

लोकलची संख्या आणि वेळापत्रकात बदल करण्याची मागणी सर्व प्रवासी करत आहेत. सकाळी ५ वाजता पहिली लोकल आणि रात्री साडेबारा वाजता शेवटची लोकल सुरू झाल्यास सामान्य नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळेल. उरण ते नेरुळ विभागात लोकसंख्या ४ लाखांहून अधिक असल्याने लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. बहुतेक कार्यालयांच्या वेळा सारख्याच असल्याने, त्या वेळेत प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. लोकल एक तासाच्या अंतराने असल्याने, एक लोकल चुकल्यास दुसरी लगेच मिळेल हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना गर्दीतून ताटकळत प्रवास करावा लागतो किंवा मग ट्रॅक्स, दुचाकी किंवा इतर धोकादायक मार्गांचा अवलंब करावा लागतो. वेळेवर पोहोचण्यासाठी तरुण मंडळी जेएनपीएला ये-जा करणाऱ्या ट्रेलरमधून ओव्हरटेक करून जीव धोक्यात घालून प्रवास करतात. या धोकादायक स्टंटबाजीमुळे अनेक कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत. काही महिन्यांपूर्वीच २९ वर्षीय एका महिलेची लोकल चुकल्याने स्कूटरवरून घरी जाण्याचा निर्णय तिच्या जीवावर बेतला. जर वेळेवर दुसरी लोकल उपलब्ध असती, तर कदाचित तिचा जीव वाचला असता.

आज या रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. केवळ रेल्वे सुरू होऊन उपयोग नाही, तर या सेवेतून प्रवाशांचे हित किती जपले जात आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकल सेवेत सुलभता, सुरक्षितता आणि आर्थिक क्षमता आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याशिवाय, रेल्वे सेवेतील गैरसोयीमुळे आणखी किती प्रवाशांचे बळी जातील, हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. उरण मार्गावर नादुरुस्त लोकल उपलब्ध असल्याचे वर्षभरात दोन वेळा निदर्शनास आले आहे, ज्यामुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि असंख्य प्रवासी त्रस्त झाले होते.

उरण-नेरुळ मार्गावर नियमित प्रवास करणारे हजारो गरीब आणि सामान्य प्रवासी मागणी करत आहेत की उरण ते सीएसटी लोकल, तसेच उरण ते पनवेल लोकल आणि उरण ते ठाणे लोकल सेवा सुरू करण्याची आज गरज आहे. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे, कारण रस्त्यावरील इतर पर्याय धोकादायक आहेत आणि लोकल प्रवास सुरक्षित तसेच सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. त्यामुळे, उरण-नेरुळ किंवा सीबीडी बेलापूर मार्गावर लोकल फेऱ्या प्रत्येक १५ मिनिटाला करण्यात याव्यात. असे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन किंवा प्रवाशांच्या उद्रेकाला सरकार आणि रेल्वेला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

सिडको बामन डोंगरी लॉटरीतील ५००० हून अधिक घरांचा ताबा मिळाल्याने आणि उलव्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने, बामन डोंगरी स्टेशनवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. प्रवाशांच्या या वाढत्या संख्येमुळे लोकल फेऱ्या जास्तीत जास्त वाढवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी अजय हेगळकर आणि त्यांचे सहकारी नरेनजी देशमुख (गव्हाणगाव), हितेश शिंगरे, स्वप्निल घाडगे, दिनेश पवार, बाबाजी कोकाटे यांनीही केली आहे. त्याचप्रमाणे, उरण लोकल संदर्भात वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून प्रवाशांच्या वतीने चव्हाण मॅडम यांनी दिले आहे. तरीही रेल्वे बोर्डात कोणतीही हालचाल दिसत नाही. सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ रामभाऊ सारिक सर यांनीही लोकल फेऱ्या एक तासाने असल्यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासावर आवाज उठवला आहे. आणि आता डॉ. नितीन दिघे यांनीही प्रवाशांना एकत्र करून, त्यांचे संघटन करून लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी सरकार आणि उपमुख्यमंत्र्यांना त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

प्रवासी वर्गातून असे बोलले जात आहे की, "झोपी गेलेल्यास जागे करता येते, पण झोपेचे सोंग करणाऱ्यास जागे करता येत नाही." एकीचे बळ मोठे असते, त्यामुळे संघटित होऊन लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी वर्गाकडून दिला जात आहे.

---------------------------------------------------------------------------------

#UranLocal #NerulBelapur #TrainProblems #PassengerDemand #MaharashtraRailways #LocalTrain #TravelWoes #Protest #CIDCO #RailwayBoard

उरण लोकलसेवा समस्यांच्या गर्तेत; प्रवाशांची गैरसोय, फेऱ्या वाढवण्याची मागणी उरण लोकलसेवा समस्यांच्या गर्तेत; प्रवाशांची गैरसोय, फेऱ्या वाढवण्याची मागणी Reviewed by ANN news network on ५/२२/२०२५ ०१:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".