रविवार, १८ मे, २०२५

खासदार श्रीरंग बारणे यांच्या कामाची दखल; 'संसदीय लोकशाहीत योगदान' पुरस्कार जाहीर

 


संसदेतील आवाज आणि जमिनीवरील काम;श्रीरंग बारणे यांना पुरस्कार

पिंपरी, दि. १८: मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय कामगिरीसाठी तिसऱ्या टर्ममध्ये 'संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान' पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील दोन टर्ममध्ये त्यांना आठ वेळा संसदरत्न, एकदा महासंसदरत्न आणि एकदा संसद विशिष्टरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मावळच्या जनतेमुळे शक्य झाला असून, तो जनतेला अर्पण करत असल्याची प्रतिक्रिया खासदार बारणे यांनी दिली.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू झाला आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बारणे यांची पुरस्कारासाठी निवड केली. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे, भर्तृहरी महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांनाही हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या खासदारांनी १६, १७ व्या लोकसभेत चांगले काम केले असून, १८ व्या लोकसभेतही ते उत्तम कामगिरी करत आहेत.

चालू १८ व्या लोकसभेत खासदार बारणे यांनी १३८ प्रश्न विचारले, ३५ चर्चांमध्ये सहभाग घेतला आणि ३ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यांची सभागृहातील उपस्थिती ९६ टक्के आहे. संसदेतील सातत्यपूर्ण कामगिरी आणि मतदारसंघातील जनहिताची कामे यांचा विचार करून त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

लोकांमधील खासदार:

खासदार बारणे यांची संसदेत उपस्थित राहणे, मतदारसंघातील प्रश्नांवर आवाज उठवणे, लोकांमध्ये मिसळणे आणि चोवीस तास उपलब्ध असणे अशी ओळख आहे. ते नम्र असून, लोकांना भेटतात, त्यांच्या अडचणींना धावून जातात आणि सुख-दुःखात सहभागी होतात. दोन जिल्ह्यांचा मतदारसंघ असूनही ते मतदारसंघात सक्रिय असतात.

जमिनीवरही काम:

खासदार बारणे यांनी केवळ संसदेत आवाज उठवला नाही, तर जमिनीवरही काम केले आहे. त्यांनी आदिवासी पाड्यांवर वीज आणि रस्त्यांची सुविधा निर्माण केली, गावागावांमध्ये अंतर्गत रस्ते आणि पाण्याची सुविधा सक्षम केली, पवना धरणातील गाळ काढून पिंपरी-चिंचवडकरांच्या पाण्याची सोय केली, पिंपरीत पासपोर्ट कार्यालय सुरू केले, क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित केले, एच. ए. कंपनीला आर्थिक मदत मिळवून दिली, पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती दिली, रेल्वेचे जाळे विस्तारले आणि रेल्वे स्थानकांचा कायापालट केला.

मावळच्या जनतेला पुरस्कार अर्पण:

खासदार बारणे म्हणाले, "दोन जिल्ह्यांच्या मावळ मतदारसंघातील जनतेने माझ्यावर तीनवेळा विश्वास टाकला. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. हा पुरस्कार मावळवासीयांसाठी करत असलेल्या कामाची पावती आहे. तो माझा नसून जनतेचा आहे. त्यामुळे मी हा पुरस्कार मावळच्या जनतेला अर्पण करतो."

----------------------------------------------------------------------------------

 #ShrirangBarne #Maval #ParliamentarianAward #ParliamentaryDemocracy #PublicContribution #MaharashtraPolitics #PoliticalNews

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा