धामणगावात फडणवीस यांची प्रचारसभा
धामणगाव (प्रतिनिधी) : विदर्भाला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. धामणगाव रेल्वे मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील दहा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. 88 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प महायुती सरकार वेगाने पूर्ण करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेताना त्यांनी एका रुपयातील पीक विमा योजनेतून 8 हजार कोटी रुपयांची भरपाई, पुढील पाच वर्षांत वीज बिल माफी आणि सौर कृषी पंपांच्या वाटपाची घोषणा केली. पुन्हा सत्तेत आल्यास संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
आमदार प्रताप अडसड यांच्या कामगिरीचा गौरव करताना फडणवीस यांनी अडीच वर्षांत 2300 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणल्याचे नमूद केले. सतरा तीर्थक्षेत्रांना प्रत्येकी पाच कोटी रुपये आणि पाथरगाव सिंचन योजनेसाठी 55 कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यात अडसड यांचे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.
सभेला माजी खासदार नवनीत राणा, सुरेशभाऊ वाघमारे, गुजरातचे आमदार बाळकृष्ण पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०९:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: