मुंबई : हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजपा) ऐतिहासिक विजय मिळवला असून, याच विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल आणि महायुतीला प्रचंड यश मिळेल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने खोट्या प्रचाराचा आधार घेतला होता, परंतु आता काँग्रेसचा खोटारडेपणा उघड पडला आहे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.
बावनकुळे म्हणाले की, हरियाणामध्ये भाजपाने सत्ता स्थापन केली आहे आणि जम्मू-काश्मीरमध्येही भाजपाला मोठे यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केली होती, मात्र आता विरोधकांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला आहे. मोदी सरकारच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देत जनतेने हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाच्या पारड्यात भरभरून मतदान केले आहे.
राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसचा खरा चेहरा आता समोर आला आहे. संविधानाचे, जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण केवळ भाजपाच करू शकतो, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार महायुतीला विजय प्राप्त करून देतील.
विरोधकांचे जातीय राजकारण हाणून पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘भाजपा घर चलो अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचून काँग्रेसने निर्माण केलेला संभ्रम दूर करेल आणि राज्य व केंद्र सरकारच्या विकासकार्यांची माहिती पोहोचवेल. भाजपा सर्व समाजांना एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, भाजपाला विजयाचा उन्माद नाही आणि पराजयाने खचत नाही. अंत्योदयाच्या भावनेने भाजपा सतत कार्यरत राहील, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: