बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत!; हिंदु जनजागृती समितीची मागणी
पुणे : बांगलादेशातील हिंदू आणि त्यांच्या मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने भारत सरकारकडे तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. बांगलादेशातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या हिंसाचाराने आता अराजकतेचे रूप घेतले आहे. हिंदूंवर जाणीवपूर्वक हल्ले करून त्यांची हत्या, घरांवर आक्रमण, दुकाने लुटणे, मंदिरांची तोडफोड आणि महिलांवर अत्याचार केले जात आहेत. या परिस्थितीमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदु जनजागृती समितीने केलेल्या मागण्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले, घरांची लूट, मंदिरांवरील हल्ले आणि महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्यात.
- बांगलादेशातील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी.
- हिंदूंच्या जीवित वा मालमत्तेची हानी झाल्यास त्याची तातडीने भरपाई करावी.
- भारत सरकारने हा विषय संयुक्त राष्ट्र संघात मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी.
- बांगलादेशातील हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या हिंदूंना नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे (सीएए) भारतात आश्रय द्यावा.
- भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करावा.
हिंदु जनजागृती समितीने सोशल मीडियावरून समोर आलेल्या अत्याचारांच्या व्हिडिओंचा उल्लेख करत भारत सरकारने वेळीच लक्ष घालण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. अन्यथा, बांगलादेश दुसरा पाकिस्तान होण्याची शक्यता आहे आणि तेथील हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार होऊ शकतो. धर्मांध जिहादी आतंकवाद्यांचे मनोबल वाढून ते भारतातही हिंसाचार माजवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि समस्त भारतियांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तसेच स्वसंरक्षणासाठी सिद्ध राहण्याचीही आवश्यकता असल्याचे समितीने म्हटले आहे
Reviewed by ANN news network
on
८/०८/२०२४ ०२:४१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: