नवी मुंबई : डोंबिवली (घेसरगाव) येथून खाजगी बसने पंढरपूरकडे निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत काही वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत आणि जखमींवर मोफत उपचार देण्याचे जाहीर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळंबोली, नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात भेट देऊन जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांनी रुग्णांना शासन आपल्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले आणि जखमींवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिक माहिती घेतली. अतीदक्षता विभागात उपचार सुरु असलेल्या रुग्णांना अधिक चांगल्या उपचारासाठी अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागल्यास तत्काळ त्यासाठी व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
अपघातामध्ये ४६ जखमी असून त्यापैकी ७ वारकरी गंभीर जखमी आहेत आणि त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. खाजगी बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातामुळे हा गंभीर प्रकार घडला आहे.
मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. अपघाताची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: