पुणे : गौतमी पाटील आणि वाद हे सध्या जणू समीकरण बनले आहे. ’बदनाम हुए तो क्या हुआ?; नाम तो हुआ!’ या न्यायाने सर्व चालू आहे असे कोणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. पण आता हे गौतमी भोवताली सुरू असणारे वाद राजकीय नेत्यांमधील वादविवादाला खतपाणी घालू लागले आहेत.
आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आता जुंपली आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमापेक्षा जास्त गर्दी होत असते असे विधान करत वादाला तोंड फ़ोडले. त्यांच्या या टिप्पणीमुळे शिंदे समर्थक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पित्त चांगलेच खवळले.
त्यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते हा एक वादग्रस्त विषय आहे. गौतमीची तुलना राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर करणे हे चुकीचे आहे. खेडचे आमदार हे अज्ञानी असून ते वेड्यांच्या नंदनवनामध्ये जगत आहेत. अशा शब्दात आमदार मोहिते पाटलांचा समाचार घेतला आहे.
एकूणात काय तर गौतमी आता राजकीय वादाला कारणीभूत ठरू लागली आहे. भविष्यात या अशा प्रकारांंमुळे गौतमीच्या कार्यक्रमापेक्षाही जास्त करमणूक असल्या कलगीतु-यांमुळे होणार की काय असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे.
Reviewed by ANN news network
on
५/३१/२०२३ ०७:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: