महावितरणच्या गलथान कारभारामुळे चाकण एमआयडीसीतील उद्योजक त्रस्त..



पिंपरी  :  गेल्या दोन महिन्यांपासून चाकण एमआयडीसी व परिसरात विजेचा लपंडाव सुरु आहे. वीज गेल्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांकडुन प्रतिसाद देखील मिळत नाही. दर गुरुवारी नियमित शटडाऊन असतो. त्यामळे ती आता जनरल प्रॅक्टीस बनली आहे. उद्योजकांसह मूळ ग्राहकांचे देखील कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. याचा दूरगामी परिणाम व्यवसायावर होत नसून देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील होत आहे. महावितरणच्या अशा हेळसांड कारभारामुळे परिसरातील अनेक उद्योजक त्रस्त आहेत, अशी कैफियत चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेच्या शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांपुढे मांडली.  


विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी चाकण एमआयडीसी ऊद्योजक संघटनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयास नुकतीच भेट दिली. यावेळी बैठकीत विविध समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. तसेच अधिकाऱ्यांना समस्या मार्गी लावण्याबाबत निवेदनही देण्यात आले.

यावेळी चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, सचिव श्रीनिवास माने, संचालक प्रवीण शिंदे, उद्योजक नंदकुमार सावंत, सुभाष गोळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता संदीप दरोडे व उपअभियंता विजय गारगोटे आदी बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. संपूर्ण चाकण एमआयडीसी व परिसरात फिडरची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे वीजपुरवठा नेहमी विस्कळीत होतो. रेणुका फिडरला ही समस्या वारंवार जाणवते. तसेच पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. संभाव्य ब्रेक डाऊन लक्षात घेता महावितरणने आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर जोमाने कार्य करावे. जेणेकरून कमीत कमी ब्रेकडाऊन पावसाळ्यात होईल.

बैठकीत अधिकाऱ्यांनी उद्योजक संघटनेच्या समस्यांची गंभीरपणे दखल घेतली. संबंधित कर्मचाऱ्यांना  सर्वांसमक्ष स्पीकर फोन लावून कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या. त्यांच्याकडून काम कधी पूर्ण होणार याच्या तारखा देखील घेतल्या. जिथे जास्त अडचण आहे तिथे महावितरण आणखी मदतनीसांची पद भरणार आहे. ब्रेक डाऊनची अडचणही लवकर सोडविली जाईल, असे आश्वासन महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता संदीप दरोडे व उपअभियंता विजय गारगोटे यांनी संघटनेला दिले.

तसेच उद्योजकांनी पावसाळ्यापूर्वी ट्रान्सफॉर्मर आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंटच्या जवळची सर्व झाडे, वेली वेळीच कापून घ्यावी जेणेकरून संभाव्य ब्रेकडाऊन कमीत कमी होईल, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

महावितरणच्या गलथान कारभारामुळे चाकण एमआयडीसीतील उद्योजक त्रस्त.. महावितरणच्या गलथान कारभारामुळे चाकण एमआयडीसीतील उद्योजक त्रस्त.. Reviewed by ANN news network on ५/३०/२०२३ ०३:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".