पिंपरी : साहित्य आणि संस्कृतीची व्यासपीठे राजकारण विरहित असली पाहिजेत तिथे राजकारण केले जाऊ नये. मात्र, राजकीय नेत्यांना साहित्य संमेलनामध्ये अस्पृश्य मानण्याचे काही कारण नाही. त्यांना योग्य तो सन्मान दिला जायला हवा असे स्पष्ट प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी गुरुवारी पिंपरी येथे केले.
साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांना सन्मानाने बोलावले जावे किंवा जाऊ नये या मुद्द्यावर विचारमंथन करण्यासाठी पिंपरी चिंचवड मधील पत्रकार आणि साहित्यिक यांच्या आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात डॉक्टर सबनीस बोलत होते.
नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देणे टाळल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने भाष्य करताना सबनीस यांनी हे विचार व्यक्त केले.
मराठी साहित्य संमेलन सर्वसमावेशक असावे. समाजातील सर्व विचारधारांचा समावेश त्यात असावा. त्याला जातीधर्माचे लेबल लावून वाद निर्माण केले जाऊ नयेत. याचबरोबर सर्व राजकीय प्रवाह त्यातील महत्वाचे नेते यांनाही त्यामध्ये यथोचित सन्मान दिला गेला पाहिजे. कारण ते या समाजाचे घटक आहेत. राजकारण हे समाजसेवेचे साधन आहे. समाजसेवा हा संस्कृती जपण्याचा एक मार्ग आहे. असेही डॉ. सबनीस म्हणाले.
देशातील अन्य कोणत्याही भाषेचे एव्हढे मोठे साहित्य संमेलन होत नाही. हे संमेलन मराठीचे वैशिष्ट्य आहे. मराठी साहित्याची ही परंपरा ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यापासून फुले, आंबेडकर यांच्यापर्यंत तसेच लोकमान्य टिळकांपासून ते आगरकर सावरकर अत्रे यांच्यापर्यंत अनेकांनी समृद्ध केली आहे त्यामुळे मराठी भाषा आणि तिचे साहित्य संमेलन हे कोणत्याही जातीआणि धर्माच्या बंधनात राहू नये त्याचबरोबर साहित्यिक आणि पत्रकार यांनी राजकीय नेत्यांच्या गुलामीत राहू नये असे स्पष्ट करत डॉ. सबनीस पुढे म्हणाले,
दुर्दैवाने आज लोकशाहीचे चारही स्तंभ पोखरले गेले आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही निर्भीडपणा जपता येत नाही हे वास्तव आहे. तथापि असे जरी असले तरी मी एकंदर समाजाच्या परिस्थितीविषयी निराश झालेला नाही. लोकशाहीची मूल्ये, सर्वसमावेशकता यावर माझा विश्वास आहे.
साहित्य आणि संस्कृतीची व्यासपीठे राजकारण विरहित असू द्या : डॉ. श्रीपाल सबनीस
Reviewed by ANN news network
on
१२/०२/२०२१ ०९:३६:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: