शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

भारतीय सैन्याचा अपमान केल्याबद्दल संजय राऊत यांनी माफी मागावी - भाजपाची मागणी


मुख्यमंत्र्यांच्या चाणक्यनीतीची संजय राऊत यांना भीती; माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा प्रहार

'औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते' म्हणून राऊत यांच्यावर टीका

देवेंद्र फडणवीस हे बहुजन समाजाचे नेते; रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर

मुंबई, (प्रतिनिधी): भारतीय सैन्याचा अपमान केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी समस्त भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना कंठस्नान घालूनही, राऊत हे दहशतवादी जिवंत असल्याचा दावा करत असल्याचा आरोप बन यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नवनाथ बन म्हणाले की, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी नेत्यांशी संवाद साधल्यामुळे संजय राऊत यांची 'चिडचिड' झाली आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत श्री. फडणवीस यांच्या चाणक्यनीतीचा अनुभव असल्याने ‘औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते’ असलेल्या राऊतांनी बेताल बडबड सुरू केली आहे. महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला लवकरच कोसळणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी रोहित पवारांवरही जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस हे बहुजन समाजाचे नेते असून, 'सबका साथ, सबका विकास' या तत्त्वावर काम करत आहेत. रोहित पवार जाणीवपूर्वक खोटी टीका करत आहेत, असे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेवरून त्यांनी रोहित पवारांना संघाचा इतिहास समजून घेण्याचा सल्ला दिला. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखे नेतेही संघाच्या व्यासपीठावर आले होते, याची त्यांनी आठवण करून दिली.



  • Sanjay Raut

  • Navnath Ban

  • BJP

  • Maharashtra Politics

  • Devendra Fadnavis

 #SanjayRaut #NavnathBan #BJP #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #IndianArmy

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा