नदीकाठच्या १३७ कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर; आणखी १०० कुटुंबांना हलवण्याची तयारी
नदीवरील जुना दगडी पूल आणि ८ बंधारे पाण्याखाली
पंढरपूर, (प्रतिनिधी): उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीला पूर आला असून, नदीने इशारा पातळी ओलांडून धोकादायक पातळीवर वाहत आहे. उजनी धरणातून सायंकाळी ६ वाजता १ लाख ५१ हजार ६०० क्युसेक आणि वीर धरणातून १५ हजार ३२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे पंढरपूर शहरातील नदीकाठावरील १३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. प्रशासनाने आणखी १०० कुटुंबांचे स्थलांतर करण्याची तयारी केली आहे. सुमारे ४०० पेक्षा जास्त लोकांनी स्वतःहून नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला आहे.
या पुरामुळे नदीवरील ८ बंधारे आणि गोपाळपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. व्यास नारायण झोपडपट्टी आणि अंबाबाई पटांगण झोपडपट्टीतील घरांमध्ये पाणी शिरले आहे. प्रांत अधिकारी सचिन इथापे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत असून, नागरिकांनी त्याचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
Pandharpur Flood
Bhima River
Ujani Dam
Evacuation
Flood Situation
#Pandharpur #Flood #BhimaRiver #UjaniDam #Maharashtra #Evacuation
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा