गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

विरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली भेट

 

जखमींवर उपचार सुरू; प्रभावित कुटुंबांना मदत करण्याचे प्रशासनाला निर्देश

पालघर, दि. २८ ऑगस्ट (प्रतिनिधी): वसई-विरार येथील विजय नगरमधील 'रमाबाई अपार्टमेंट' या चार मजली इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. यामध्ये ६ महिला, ८ पुरुष आणि ३ बालकांचा समावेश आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.

२६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. या घटनेत ९ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर वसई-विरार महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि जखमी नागरिकांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

घटनास्थळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे, आमदार राजन नाईक आणि वसई-विरार महानगरपालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाजन यांनी प्रशासनाला जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याचे निर्देश दिले. तसेच, प्रभावित नागरिकांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या जमीन मालक आणि विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आल्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले.



  • Girish Mahajan

  • Virar

  • Building Collapse

  • Disaster Management

  • Maharashtra

  • Palghar

 #GirishMahajan #Virar #BuildingCollapse #DisasterManagement #Maharashtra #Palghar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा