रत्नागिरी, २० जून २०२५: रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत पावसाचा चांगलाच जोर दिसून आला, मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार, मंडणगड तालुक्यात सर्वाधिक १४४.७५ मिमी पावसाची नोंद झाली, तर खेड तालुक्यात ११२.५७ मिमी पाऊस पडला.
काल (१९ जून) खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड बाजारपेठेत पाणी शिरले होते. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला होता. तथापि, काल रात्रीपासून नदीची पाणीपातळी ओसरायला सुरुवात झाली असून, सध्या ही नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. खेड शहरातील भरलेले पाणी आता पूर्णतः ओसरले असून, खेड नगर परिषदेमार्फत आज सकाळपासूनच शहरात स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. परिस्थिती सामान्य होत असल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही पाऊस सुरूच होता. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये दापोलीत ७३.२८ मिमी, संगमेश्वरमध्ये ५४.१६ मिमी, चिपळूणमध्ये ४०.८९ मिमी, लांज्यात २९.८० मिमी, राजापुरात २५.६२ मिमी, गुहागरमध्ये २३.४० मिमी, तर रत्नागिरीत ११.६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या तरी जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Ratnagiri, Mandangad, Khed, Jagbudi River, Rainfall, Monsoon, Flood, Waterlogging, Post-Flood Cleaning, Maharashtra Rains
#RatnagiriRains #KhedFloods #Monsoon2025 #JagbudiRiver #MaharashtraWeather #RatnagiriNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: