सोमवार, २ जून, २०२५

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किसान सभेचे कोकण भवनवर धडक आंदोलन

 


उरण, दि. २: अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज, सोमवार दिनांक २ जून २०२५ रोजी कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या घरे आणि जमिनीच्या प्रश्नांवर करण्यात आलेल्या आंदोलनाचा हा एक भाग होता.

या निदर्शनानंतर किसान सभेच्या शिष्टमंडळाने कोकण विभागाचे पुनर्वसन सहआयुक्त रवींद्र पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गेल्या ५० वर्षांपासून रायगड आणि नवी मुंबई परिसरात विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. यामुळे येथील शेती उद्ध्वस्त झाली असून आता विकासाच्या नावाखाली गावेही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला.

या धोरणांविरोधात शेतकऱ्यांनी जमिनी आणि घरांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. आंदोलकांनी विरार-अलिबाग कॉरिडॉर / पागोटे ते चौक ग्रीनफिल्ड महामार्ग आणि रेवस रेड्डी सागरी महामार्गासाठीच्या भूसंपादनास गुंठ्याला ५० लाख रुपये सरसकट दर जाहीर करण्याची मागणी केली. तसेच, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन केवळ १९५५ चा हायवे ॲक्ट न लावता, २०१३ च्या भूसंपादन कायद्याची पूर्ण अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यासोबतच, शेती आणि घरांसाठी पर्यायी जमीन देण्याची, खाडी किनाऱ्यावरील शेती व गावे वाचवण्यासाठी बांधबंधिस्तीचे मजबुतीकरण करण्याची, सिडको, नैना, एमएमआरडीए मध्ये येणाऱ्या गावातील घरांना व विस्तारित गावठाणातील घरांना प्रॉपर्टी कार्ड (सनद) देण्याची मागणी करण्यात आली. लॉजिस्टिक पार्कचे भूसंपादन २०१३ च्या कायद्यानुसार करावे, गेल पाईप लाईनग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, शेती आणि गावे उद्ध्वस्त करणारे नैना व एमएमआरडीए प्रकल्प रद्द करावे, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना वाढीव घरभाडे द्यावे, शून्य पात्रता रद्द करावी, तलावपालीला तिप्पट जागा द्यावी, मच्छीमारांना नुकसान भरपाई व प्रत्येक वारसाला विमानतळामध्ये कायम नोकरी द्यावी, सिडकोच्या साडेबारा टक्के भूखंडाचे त्वरित वाटप करावे, मावेजा रद्द करावा आणि गरजेपोटी स्वतःच्या जागेत बांधलेल्या घरांना कायमस्वरूपी प्रॉपर्टी कार्ड द्यावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. जेएनपीटी १२.५% योजनेच्या भूखंडाचे वाटप सिडकोप्रमाणे करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.

आंदोलकांनी केंद्र सरकारवर शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणे अवलंबल्याचा आरोप केला.

या निदर्शनात किसान सभेचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, संजय ठाकूर, कामगार नेते भूषण पाटील, जनवादी महिला नेत्या हेमलता पाटील, तसेच किरण केणी, अशोक हुद्दार, अशोक भोपी, चांगुणा डाकी, जयश्री माळी आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------------------

#KisanSabha #FarmersProtest #KokanBhavan #LandAcquisition #FarmersRights #NaviMumbai #MaharashtraFarmers

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा