पुणे, १७ जून २०२५: मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पादचारी पूल वाहून गेल्याची दुर्घटना अत्यंत दुःखद असून, मृतांच्या कुटुंबासोबत व जखमी झालेल्यांमागे महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी स्पष्ट केले. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल, अशी ग्वाहीही श्री. चव्हाण यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर; 'उथळ आणि अपरिपक्व विचारांचे प्रदर्शन'
या दुःखद प्रसंगी खासदार संजय राऊत यांनी केवळ राजकारण करण्याच्या उद्देशाने केलेली टीका ही अत्यंत उथळ आणि अपरिपक्व विचारांचे प्रदर्शन करणारी आहे, अशी घणाघाती टीका रविंद्र चव्हाण यांनी केली. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
८ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता; १ वर्षात काम पूर्ण करण्याच्या सूचना
श्री. चव्हाण यांनी कुंडमळा नदीवरील जोडरस्त्यासह नवीन पुलाच्या बांधकामासाठी जुलै २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ८ कोटी रुपयांच्या तरतुदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर २०२४ विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली. दरम्यानच्या काळात सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता व पुलाचे डिझाईन अंतिम करण्यात आले. मावळ तालुक्याचे भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी पाठपुरावा केल्यानंतर शेतकरी व लोकहितासाठी ११ जुलै २०२४ रोजी ८ कोटी रुपयांच्या रक्कमेच्या नवीन पुलास प्रशासकीय मंजुरी दिल्याचे पत्र दिले होते. बांधकाम विभागातर्फे या पुलाच्या दुरुस्तीचा कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, एका वर्षात काम पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या होत्या.
'हेतूपूर्वक विलंब लावला असेल तर चौकशी होईल, दोषींवर कारवाई'
असे असताना पुढील प्रक्रियेला हेतुपूर्वक विलंब लावला गेला असेल तर त्याची चौकशी होईल आणि दोषींवर कारवाईही होईल, असेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले. सरकार कोणत्याही चुकीच्या कामाला पाठीशी घालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
'अर्थसंकल्प कसा वाचावा' - राऊतांना पुस्तक भेट देण्याची मिश्किल टिप्पणी
राज्यसभा खासदार असलेल्या संजय राऊत यांना अर्थसंकल्प कसा वाचायचा याची ढोबळ माहितीही नसल्याचे त्यांच्या टीकेवरून दिसत आहे. या पुलाच्या कामासंदर्भात श्री. राऊत यांनी केलेल्या आरोपांची कीव येते. अर्थसंकल्पात आकडे हजारात असतात. त्या हिशोबानुसार या पुलाच्या दुरुस्तीसाठी ८ कोटींची तरतूद करण्यात आली होती. हे खासदार असलेल्या राऊत यांना कळत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले 'अर्थसंकल्प – सोप्या भाषेत' हे पुस्तक श्री. राऊत यांना भाजपातर्फे भेट देऊ, अशी मिश्किल पुस्तीही चव्हाण यांनी जोडली.
Kundmala Bridge, Bridge Collapse, Ravindra Chavan, Sanjay Raut, BJP, Political Criticism, Government Action, Inquiry, Infrastructure, Maharashtra Politics
#KundmalaBridge #RavindraChavan #SanjayRaut #BJP #MaharashtraPolitics #BridgeCollapse #Infrastructure #PoliticalNews #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: