नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस आयुक्त श्री. मिलींद भारंबे यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखेने केलेल्या एका विशेष मोहिमेत ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे, तर त्यांना भारतीय कागदपत्रे बनवून देणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीलाही सह-आरोपी करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरात घुसखोरी करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्यास मदत झाली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पनवेल येथील करंजाडे, सेक्टर ६, ब्लू किश सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत आहेत. या माहितीच्या आधारे ४ मे २०२५ रोजी सकाळी ९.१६ वाजता पथकाने छापा टाकला. त्यावेळी घटनास्थळी ३ पुरुष आणि ३ महिला असे एकूण ६ जण आढळले. त्यांच्या चौकशीत असे समोर आले की, आरोपींपैकी काहीजण व्हिसाद्वारे भारतात आले होते, परंतु त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते अवैधरित्या भारतात वास्तव्य करत होते. तर काहीजण व्हिसाशिवायच भारतात घुसले होते.
या छाप्यात अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये मोहम्मद रफिक अब्दुल हकीम सय्यद (वय २८), फरजाना सुलतान मोहम्मद हुसेन मोल्ला (वय २८), महबुबा जकीर हुसैन शेख (वय २८), रफिकुल ईस्लाम मियाजानपुर (वय ५२) आणि मोसा हुमेरा मोहम्मद इब्राहिम (वय २२) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम १९५० आणि विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान, मोहम्मद इस्माईल अमिन्नोदीन येरुलकर (वय ५२, रा. करंजाडे, पनवेल) या निवृत्त व्यक्तीलाही अटक करण्यात आली. आरोपी येरुलकर याने या बांगलादेशी नागरिकांना भारतीय कागदपत्रे बनवण्यासाठी आणि भारतात बेकायदेशीरपणे राहण्यासाठी मदत केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे अवैध घुसखोरीला मदत करणाऱ्या स्थानिक यंत्रणा आणि व्यक्तींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास करत असताना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बनावट पासपोर्ट आणि जन्मदाखले बनवून देणाऱ्या एका मोठ्या टोळीचाही छडा लावला. या प्रकरणात राहुल उर्फ मिकाईल इस्माईल गाझी याला ११ मे २०२५ रोजी अटक करण्यात आली. त्याच्यावर २०१२ मध्ये मुंबईतील विशेष शाखेने गुन्हा दाखल केला होता आणि त्याच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. ही कारवाई बांगलादेशी घुसखोरी आणि बनावट कागदपत्रांच्या रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा महत्त्वाचा प्रयत्न आहे.
या यशस्वी कारवाईचे श्रेय अपरआयुक्त (गुन्हे)दीपक साकोरे, उप आयुक्त (गुन्हे) अमित काळे, सहा. आयुक्त अजयकुमार लांडगे, सहा. आयुक्त धर्मपाल बनसोडे (AHTU, गुन्हे शाखा) आणि वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाला देण्यात आले आहे. या पथकात पोउपनि सरिता गुडे, सपोनि योगेश देशमुख, सपोनि अलका पाटील यांच्यासह इतर अंमलदारांचा समावेश होता.
नवी मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध घुसखोरीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
Illegal Immigration, Bangladeshi Nationals, Human Trafficking, Fake Documents, Navi Mumbai Police, Crime Bust, Law Enforcement, Maharashtra
#NaviMumbaiPolice #IllegalImmigration #BangladeshiNationals #FakeDocuments #CrimeBust #LawEnforcement #Maharashtra #AntiTrafficking

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: