उरण - कामगार क्षेत्रात आपल्या प्रामाणिक आणि अथक प्रयत्नांनी नाव कमावलेले कामगार नेते रवि शांताराम घरत यांची उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या तालुका चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आमदार विवेकानंद पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. रविवारी पेझारी येथे झालेल्या शेकापच्या भव्य मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील शेकापच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. यात उरणची धुरा तरुण आणि तडफदार रवि घरत यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत कामगार क्षेत्रात हजारो कामगारांना न्याय मिळवून देताना, स्थानिक भूमिपुत्रांना अधिकाधिक सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. डीपीटीसारख्या धोरणांमुळे कंपनी आणि कामगार दोघांनाही वाचवण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. त्यांच्या या कामामुळे उरण तालुक्यात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून शेकापच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी ते प्रामाणिकपणे आणि समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे, शेकापचे अर्ध्वयू लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावी जासईत अनेक वर्षांनंतर रवि घरत यांच्या रूपाने तालुका चिटणीसपद मिळाल्याने जासईत जल्लोषाचे वातावरण आहे. जासई ग्रामपंचायतीची सत्ता अनेक वर्षांपासून शेकापने टिकवून ठेवली आहे. रवि घरत यांच्या रूपाने मिळालेले हे पद शेकापला उरण तालुक्यात नवी उभारी देईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
शेकाप संपला, अशी टीका करणाऱ्यांना पक्षाने अलिबागच्या पेझारीत मेळावा घेऊन चोख प्रत्युत्तर दिले आहे. पक्षाच्या कठीण काळात खंबीरपणे उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचे माजी आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्या सूचनेनुसार, पक्षाची ९० टक्के जबाबदारी तरुणाईच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पक्षाची फेररचना करण्यात आली आहे. उरण तालुक्याच्या चिटणीसपदाची धुरा रवि घरत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
कामगारांचे प्रश्न सोडवताना कायद्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी हजारो कामगारांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच ताकदीने पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्यांवर कसा अन्याय करत आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवून पक्षाला पुन्हा चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भोळ्या आशेने सत्ताधारी गटात गेलेल्या कार्यकर्त्यांना भविष्यात पश्चात्ताप होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सर्वांना सोबत घेऊन शेकापला नंबर वन बनवण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------------------------------------------------------------
#ShekapParty #UranPolitics #RaviGharat #PoliticalAppointment #MaharashtraPolitics #LocalElections #JayantPatil #WorkersLeader #PeasantsAndWorkersParty #PoliticalNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: