पुणे, दि. २६: आगामी आषाढी एकादशी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, शौचालये, आरोग्यव्यवस्था आणि औषधसाठा यांची उत्कृष्ट व्यवस्था करण्याचे निर्देश पुणे महसूल विभागाच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिले. पालखी सोहळा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानभवन येथे आयोजित आषाढी एकादशी यात्रा पालखी यात्रा पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पुणे पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त महेश पाटील उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि विविध पालखी सोहळ्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पालखीला जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकत्रित नियंत्रण कक्ष समन्वयाने सुरू ठेवावा आणि सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे, असे नियोजन करण्याचे निर्देश द्विवेदी यांनी दिले. गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी पालखी मार्गावर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करावा. आवश्यक ठिकाणी निरीक्षण मनोरे उभारावेत आणि साखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात करावे. पार्किंगची व्यवस्था पुरेशी ठेवावी, यावर लक्ष देण्याचेही त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करावी. मुख्य मार्गांबरोबरच पालखी मार्गांना जोडणाऱ्या कच्च्या रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्यांवरील राडारोडा हटवणे आणि मुरमीकरण करणे यांसारख्या उपाययोजना कराव्यात.
वारकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी टँकर भरण्याच्या स्रोतांची तपासणी करावी आणि निर्जंतुकीकरणासाठी योग्य टीसीएलची व्यवस्था करावी. खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी. जेवणानंतर उरलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावावी, जेणेकरून रोगराई पसरणार नाही.
मोबाइल स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी आणि त्यांच्या नियमित स्वच्छतेसाठी पुरेसे कर्मचारी नेमावेत. पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी. स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याचे टँकर, नियंत्रण कक्ष आणि भोजनव्यवस्था यांची माहिती देणारे दिशादर्शक फलक लावावेत. वाहतुकीसाठी रस्ते बंद केल्यास पर्यायी मार्गांची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावी, अशा सूचनाही द्विवेदी यांनी दिल्या.
बैठकीत पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्याची योजना सांगितली. सातारा जिल्हाधिकारी पाटील यांनी खासगी कुटुंबांनी वारकऱ्यांसाठी शौचालये उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती दिली. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी पुणे जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत सोपानदेव महाराजांच्या पालखीसाठी टँकर, आरोग्य पथक आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक नियोजनाबाबत माहिती दिली. विविध संस्थांच्या प्रतिनिधींनीही यावेळी सूचना मांडल्या.
-------------------------------------------------------------------
#AshadhiEkadashi #PalkhiSohala #Pune #MaharashtraPilgrimage #Wari2025 #ExcellentPlanning #AdministrativeInstructions #PilgrimWelfare

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: