शनिवार, १७ मे, २०२५

शस्त्रे, स्फोटके आणि सामाजिक नैतिकता धोक्यात आणणाऱ्या वस्तूंवर मुंबईत बंदी

 


मुंबई: बृहन्मुंबईमध्ये सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी २१ मे २०२५ ते १९ जून २०२५ या काळात अनेक गोष्टींवर बंदी घातली आहे. पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ३७, २, आणि १० अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार, मुंबईत शस्त्रे, अग्निशस्त्रे, तलवारी, भाले, दंडुके, विना परवाना बंदुका, चाकू आणि शारीरिक हानी पोहोचवणारी इतर हत्यारे बाळगण्यास मनाई आहे. तसेच, कोणताही विषारी पदार्थ, स्फोटके किंवा क्षेपणास्त्रे घेऊन जाण्यास, त्यांची तयारी करण्यास आणि त्यांचे प्रदर्शन करण्यासही बंदी आहे.

याव्यतिरिक्त, सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती, प्रेत, आकृती किंवा पुतळे यांचे प्रदर्शन करणे, घोषणा देणे, गाणी गाणे, संगीत वाजवणे आणि सामाजिक नैतिकता धोक्यात आणणारी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तूंचे प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे यावरही प्रतिबंध आहे.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्याचा भाग म्हणून शस्त्रे बाळगण्यास या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच, सुरक्षा रक्षक, गुरखा आणि चौकीदार यांना ३.५ फूट लांबीपर्यंत लाठी बाळगण्याची परवानगी असेल.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या संबंधित कलमांनुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

---------------------------------------------

#MumbaiPolice #WeaponBan #PublicSafety #LawAndOrder #Mumbai

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा