गीत-गझलांच्या अल्बमसह काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे - ज्येष्ठ गझलकार आणि कवी राजेंद्र शहा यांच्या 'एकांतस्वर' या नव्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन काल सायंकाळी गणेश हॉल येथे संपन्न झाले. विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित आणि ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
याच कार्यक्रमात राजेंद्र शहा यांच्या गीत-गझलांचा राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेला अल्बमही सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या अल्बममध्ये सुरेश वाडकर, रवींद्र साठे, पं. रघुनंदन पणशीकर, हृषिकेश रानडे यांसारख्या दिग्गज गायकांनी आपला आवाज दिला आहे.
प्रसिद्ध गझलकार रमण रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविता-गीत-गझलांच्या मैफलीत प्रदीप निफाडकर, म.भा.चव्हाण, ज्योत्स्ना चांदगुडे, डॉ.संदीप अवचट आणि राजेंद्र शहा यांनी सहभाग घेतला.
"१९६०-७० च्या दशकातील मंतरलेल्या काळाची आठवण करून देणारे राजेंद्र शहा यांनी निसर्गप्रेमी मानवतावादाची वाट धरली आहे," असे प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी आपल्या भाषणात नमूद केले. तर विजय कुवळेकर यांनी "दुसऱ्या काव्यसंग्रहासाठी वीस वर्षे थांबणारे शहा यांसारखे कवी दुर्मिळ असून, त्यांच्या कवितेत प्रकाशाच्या कवडशांचा शोध आहे," असे मत व्यक्त केले.
साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते. संवेदना प्रकाशनने प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह लवकरच वाचकांच्या भेटीस येणार आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ ०९:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: