खेडमधील समुदाय संसाधन व्यक्तींना स्मार्ट मोबाईल वितरण
रत्नागिरी : महिलांचा सन्मान, महिलांचा आदर हेच आमचे प्राधान्य आहे. त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांची उन्नती करण्यासाठी बक्षीस म्हणून मोबाईल देणारा राज्यातील पहिला जिल्हा आहे. पिंक रिक्षा महिलांना उपलब्ध करुन दिली जाईल. त्यासाठी यादी द्यावी, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
खेड येथील वैश्य भवनात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानमध्ये कार्यरत समुदाय संसाधान व्यक्तींना स्मार्ट मोबाईलचे वितरण पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार योगेश कदम, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपविभागीय अधिकारी खेड शिवाजी जगताप, दापोली प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, शशिकांत चव्हाण, अण्णा कदम आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, 2400 सीआरपींना मोबाईल बक्षीस म्हणून दिला जात आहे. ग्रामसंघाच्या कार्यालयामध्ये महिलांना स्वत:ची जागा मिळत आहे. मतदार संघांमध्ये विक्री व प्रशिक्षण केंद्र होत आहेत. कोतवाल, होमगार्ड यांना मानधन वाढवून दिले आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनाही न्याय देणारे शासन आहे. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी केले आहे. महिलांना सुरक्षा देणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री अण्णपूर्ण योजना, पिंक रिक्षा, लेक लाडकी योजना, युवा प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, समाजातील प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून निर्णय घेणारे आमचे शासन आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, उलट भविष्यात त्यामधील निधीत वाढ होईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
आमदार श्री. कदम म्हणाले, महिलांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या सन्मानार्थ शासनातर्फे हातभार लावला जातो. मतदार संघात विक्री केंद्र उभे करण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले आहे. त्यासाठी २ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महिलांच्या उन्नतीचा विचार शासनाने केला आहे. त्यासाठी १५ हजारावरुन ३० हजार फंड केला आहे. एसटी प्रवासात ५० टक्के प्रवास सवलत दिली आहे.
यावेळी मंडणगड, दापोली आणि खेड मधील सीआरपींना प्रातनिधीक स्वरुपात मोबाईलचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचा सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
खेड उपविभागीय कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुदळ मारुन आणि कोनशिला अनावरण करुन, खेड उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजन आज करण्यात आले.
याप्रसंगी आमदार योगेश कदम, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, अण्णा कदम, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, प्रांत कार्यालयासाठी ५ कोटी रुपयाचा निधी दिला आहे. हे कार्यालय सर्वांसाठी महत्वाचे आहे. सर्वसामान्य जनतेला स्वत:च्या घरात गेल्यासारखे या कार्यालयात वातावरण हवे, असे ते म्हणाले.
Reviewed by ANN news network
on
१०/०१/२०२४ ०८:३६:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: