उन्हाळ्यात डासांना जगवते विदेशी वेडी बाभळ तर भारतीय पळस ठेवतो डासांची संख्या नियंत्रणात; डॉ संतोष पाटील यांचे मौलिक संशोधन
वेड्या बाभळीचे जैविक आक्रमण भारतास घातक...
दिलीप शिंदे
सोयगाव : जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी नुसार डासांमुळे देशात दरवर्षी मलेरिया व डेंग्यु सारख्या आजाराने एक कोटी हुन अधिक लोकं आजारी पडतात तर देशातील सतरा मृत्यू पैकी एक मृत्यू हा डासजन्य आजारामुळे होतो. भारतात कोणतेही नदी,तलाव, ओढे -नाले, मोकळ्या ओलसर जागा या ठिकाणी हमखास आढळणारे झुडूप म्हणजे वेडी बाभूळ.हिस विलायती बाभूळ असे ही म्हटले जाते.ही प्रजाती मूळची मेक्सिको-दक्षिण अमेरिका व आफ्रिका मधील.चुकून भारतात आली व पाण्याच्या जागी फोफावली.भारतात या वेड्या बाभळी ने जणू जैवविविधतेवर आक्रमणच केलंय व अनेक समस्याही निर्माण केल्या आहे. वेडी बाभूळ या त्रासदायक व पळस या उपयोगी भारतीय वनस्पतीवर सिल्लोड येथील जैवविविधता ,पर्यावरण संवर्धक डॉ .संतोष पाटील यांनी 3 वर्षे संशोधन करीत अनेक निरीक्षने नोंदविली आहेत.या वेड्या बाभळी चे शास्त्रीय नाव "प्रोसोपीस ज्युलिफेरा" असे आहे.
डॉ पाटील यांनी नोंदवलेली निष्कर्षने काय आहेत: - मलेरिया ला कारणीभूत असणारी ऍनोफिलीस व डेंग्यु ला कारणीभूत असणारी "एडिस इजिप्तीस" या डासांना वेड्या बाभळीच्या उन्हाळ्यात येणारी फुले त्याच्या मधुर वासाने आकर्षित करतात.वेड्या विदेशी बाभळी या स्वच्छ व घाण पाणी या दोन्ही ठिकाणी हमखास आढळतात व त्याचे जवळच असणाऱ्या पाण्यात उपरोक्त डास अंडी घालतात. या डासांना उन्हाळ्यात अन्न म्हणून" नेक्टर" पुरविण्याचे काम या फुलांकडून होते.विदेशी बाभळीच्या फुलांमध्ये जी मॅनॉल व ऍराबोनोस नावाची साखर असते ती डासांना ऊर्जा देते व त्यांना अधिक काळ जगविते.बारा ते तेरा दिवस आयुष्यमान असलेले डास अधिक काळ जगतात व त्यांचे प्रजोत्पादन वाढीस लावण्यासाठी ही विदेशी वनस्पती हातभार लावते.डासांची अंडी घालण्याची जागा व अन्न उपलब्धी एकाच ठिकाणी होत असल्याने डास अधिक फोफावतात. यासोबतच भारतीय वनस्पती विश्वात मौलिक स्थान असलेल्या व सद्या फुललेल्या पळस फुलांवर ही डॉ. पाटील यांचे संशोधन झाले असून त्यात पळसाच्या फुलांना जरी अत्यंत मंद गंध असला तरी डासांच्या सोंडेत असलेले सी १६:१ व सी १८: १ मेथीलईस्टर या घटकाणे डास त्या फुलांकडे आकर्षित होतात. मंद गंध व रंग यामुळे ते आकर्षीले जातात.या फुलांची पाकळी ही बंदिस्त असते व त्यात थोड्या फटी असतात ज्यात डासांना हा बंदिस्त पणा अधिक भावतो.डास या फुलांच्या तळाशी "बेस-बॉटम " तेथील ओलावा- मॉईसचर व चिकट स्त्राव यामुळे तेथे अंडी घालतात मात्र फुलांमध्ये व तेथील स्त्रावामध्ये असणाऱ्या ट्राय टरपीन,मोपॅनॉल्स ,कॅलकॉन्स या कीटकनाशक द्रव्याने डासांच्या अंड्या वरील "आऊटर कोरीऑन "हे आवरण नष्ट होते व अंडी वांझ होऊन उबवणे थांबते व त्यांची संख्या तिथून वाढत नाही.प्राचीन आयुर्वेदात पळस फुलांपासून "किनो तेल " बनवले जात असे जे कीटक दंश व डास आदी चावू नये म्हणून अंगास लेपन करण्याचा उल्लेख आहे त्यात आता या संशोधनाची भर पडली आहे.
पळस बहुगुणांचा कळस
ज्या ठिकाणी विलायती बाभूळ अधिक तिथे डासांची पर्यायाने डासजन्य आजार अधिक होऊ शकतात म्हणून या विदेशी वनस्पतीचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे तसेच पळस या भारतीय वनस्पतीत अनेक उपयोगी गुणधर्म व पर्यावरणीय मूल्य असल्याने तिची नदी -नाले व गावाजवळ हमखास लागवड व्हावी म्हणजे डासांची उत्पत्ती रोखली जाऊ शकते.याबाबतचा माझा "इथनोमेडिसीनल अँड इंसेक्टीसीडल प्रोपर्टी ऑफ बुटीया मोनॉस्पर्माँ"(ethnomedicinal and insecticidal property of butea monosperma) हा शोध निबंध लवकरच एशियन जर्नल्स ऑफ इथनोमेडिसिन मध्ये प्रसिद्धीस पाठविण्यात येत आहे.
- डॉ.संतोष पाटील, जैवविविधता व पर्यावरण संवर्धक,
अभिनव प्रतिष्ठान ,सिल्लोड-सोयगाव

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: