सोमवार, ११ मार्च, २०२४

पन्नालाल सुराणा, डॉ.वा.ल.मंजुळ, प्रा.निशिकांत ठकार यांना जीवनगौरव प्रदान

 


पुणे : प्रा.डॉ.अप्पासाहेब पुजारी कुटुंबीय(मंगळवेढा) आणि तेजस प्रकाशन(कोल्हापूर) यांच्यावतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा,डॉ.वा.ल.मंजुळ,प्रा.निशिकांत ठकार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला . याच कार्यक्रमात प्रा.अप्पासाहेब पुजारी लिखित आणि तेजस प्रकाशन(कोल्हापूर) यांनी प्रकाशित केलेल्या 'अक्षरे अश्रूंची-भाग १' या पुस्तकाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात  आले.

दि.१० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता  गांधीभवन(कोथरूड) येथे झालेल्या कार्यक्रमात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी,ज्येष्ठ स्तंभलेखक सुधींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात  आले.प्रत्येकी २१ हजार रोख ,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

 अप्पासाहेब पुजारी यांचा जिव्हाळा एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने '' पुरस्काराने गौरव करण्यात आला.

 डॉ. सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, ' आप्पासाहेब पुजारी हे कर्मयोगी आहेत. त्यांनी दारिद्र्याच्या दुःखातून स्वतःच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात सुखाचे मळे फुलवले. चार भिंतींच्या शाळेच्या बाहेरही उरते तेच शिक्षण असते. आज मात्र ट्यूशन हीच पर्यायी शिक्षण पध्दती होऊ पाहात आहे.   पूर्वी शाळेच्या वेळेनंतरही घरी विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवणी घेणारे शिक्षक होते.

आता जरी विकसित भारत चा नारा दिला जात असला, आर्थिक समृद्धी, जिडीपी चे दाखले दिले जात असले तरी भारत याआधीच सर्वार्थाने विकसित देश आहे.भारताची भाषा संपदा हीच मोठी संपत्ती आहे. अजून ५० वर्षांनी मराठी, कन्नड सारख्या प्रादेशिक भाषा नष्ट होणार असतील, तर भारत विकसित होवून काय उपयोग होणार? इथून पुढे भाषेची, साहित्याची समृद्धी देखील जपली पाहिजे'.



तुषार गांधी म्हणाले , 'उच्चवर्णीयाच्या घरचे पाणी पिण्याने दलिताची हत्या होते. हा कसला विकसित भारत होवू शकतो ? जामनगरला झालेले कार्यक्रम हे संपत्तीचे प्रदर्शन होते . उद्या आपण प्रथम क्रमांकावर असू की नाही , या भीतीतून केलेले संपत्ती प्रदर्शन आहे.  अशा पार्श्वभूमीवर लोकांना प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांची गरज आहे, ही गरज 'अक्षरे अश्रूंची' हे पुस्तक पूर्ण करते.आजच्या पिढीला चांगले शिक्षक मिळण्याची आवश्यकता आहे.

पन्नालाल सुराणा, निशिकांत ठकार, वा. ल. मंजूळ , अप्पासाहेब पुजारी यांनीही मनोगत व्यक्त केले. 

जलसंपदा खात्याचे माजी सचिव डॉ. दि. मा. मोरे यांनी प्रास्ताविक केले.कामाक्षी भाटे,  अन्वर राजन,श्री.नाडगौडा, श्री.बोथरा आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा