मुंबई : राज्यामध्ये काही विशेष पक्ष, गट आणि त्यांचे विशेष नेते हे महाराष्ट्रातील जाती -जातीमध्ये विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही पक्ष, काही गट आणि काही नेते आणि काही गटाचे नेते हे राज्यातलं जातीय सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना याची माहिती आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.
दादर वसंत स्मृती येथे आज भाजपा महाराष्ट्र पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून केंद्र स्तरावर ठरलेल्या रचनेसंबंधीचे मार्गदर्शन राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकी विषयीची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी माध्यमांना दिली यावेळी पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार ॲड आशिष शेलार यांनी सांगितले की, प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची संपूर्ण राज्याची महत्त्वाची पूर्वनियोजित बैठक एका विशिष्ट कालावधीनंतर सातत्याने आम्ही घेत असतो यामध्ये राज्यभरातील राजकीय घडामोडी,संघटनात्मक बांधणी, केंद्राचे आणि स्थानिक कार्यक्रमाचे नियोजन आणि या सगळ्यातून भाजपा संघटना रचनेच्या आधारावर सामान्य माणसाची सेवा अजून चांगली कशी करता येईल यासंबंधीचा आढावा अशा बैठकांमध्ये घेण्यात येतो.
देशातील महिलांना आरक्षण देणारे विधेयक मांडून ते लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर केल्याबद्दल आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांनी मांडला. महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.प्रत्येक बैठकीत मागील काळातील कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येतो. काही विशेष कार्यक्रम घेऊन भाजपा शासकीय यंत्रणेसोबत संघटक म्हणून उतरली आहे. बूथ सशक्तिकरण, मेरी माटी मेरा देश अशा सगळया कार्यक्रमांचा आढावा व आगामी नियोजन याबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली.राज्यांमध्ये महाविजय 2024 हा एक विषय घेऊन आम्ही उतरलो यामध्ये लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याच्या दृष्टीने कार्यरत होणे, सध्याची राजकीय परिस्थिती आणि आपल्या भूमिका काय असल्या पाहिजेत या बद्दलचे मार्गदर्शन आजच्या बैठकीत करण्यात आले. काही पक्ष व गट राज्यातील जातीय सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत.याबद्दल आजच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.
भाजपा, मा. एकनाथ शिंदेजी, मा. देवेंद्रजी आणि मा. अजितदादा पवार आणि सहकारी पक्ष यांच्या नेतृत्वाचे महायुतीचे सरकार ‘ सबका साथ सबका विकास ’चा नारा देऊन काम करीत आहे. त्यातून जातीय सलोखा राखला जावा, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही काम करीत आहोत. पण समाजातील सलोखा बिघडवणारे पक्ष, गट आणि त्यांचे नेते यांना सडेतोड उत्तर महाराष्ट्रातील सर्व जनतेला बरोबर घेऊन देण्याच्या दिशेने भाजपाची यंत्रणा काम करत आहे, याची माहिती योग्य वेळेला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देतील, असे सुतोवाचही आमदार ॲड आशिष शेलार यांनी केले.
Reviewed by ANN news network
on
१०/०३/२०२३ ०६:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: