रत्नागिरी : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी संदेश देत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रविवार दि ३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वा. पोलीस परेड ग्राउंड येथून सायकल रॅली काढण्यात येणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पर्यावरणपूरक सायकल रॅलीच्या नियोजन बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मीन, प्र. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, मुख्याधिकारी तुषार बाबर, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत व अन्य सदस्य उपस्थित होते.
पोलीस परेड ग्राऊंड येथून या रॅलीला प्रारंभ होणार असून, मारुती मंदिर-गोडावून स्टॉप-आरटीओ ऑफीस-कुवारबाव-रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन मार्गे परत कुवारबाव-मारुती मंदिर-जयस्तंभ-रामआळी-गाडीतळ-टिळक आळी-काँग्रेस भुवन-आठवडा बाजार मार्गे येवून पोलीस परेड ग्राऊंड येथे या रॅलीची सांगता होणार आहे. पर्यावरणपूरक मातीच्या, कागदी मूर्त्यांचा वापर, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर, सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर न करता कागद, कापडी पडद्यांचा वापर तसेच ,मोठे ध्वनीवर्धक टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर याबाबत या रॅलीमधून संदेश देण्यात येणार आहे.
या रॅलीच्या आयोजनासंदर्भात संबंधित विभागांनी आपली कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्यांना टी-शर्ट व सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत.
बैठकीला विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
८/३१/२०२३ ०४:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: