प्रागतिक पक्षांच्या सत्ता परिवर्तन शिबिराला मोठा प्रतिसाद
पुणे : प्रागतिक विचारसरणीच्या राज्यातील १३ घटक पक्षांच्या पुण्यात झालेल्या दोन दिवसीय सत्ता परिवर्तन शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकरी कामगार पक्ष,स्वाभिमानी पक्ष व शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,भारतीय कम्युनिस्ट पार्टी, जनता दल सेक्युलर महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा लिब्रेशन पार्टी, रिपाई सेक्युलर पार्टी, श्रमिक मुक्ती दल यांच्या वतीने दोन दिवसीय सत्ता परिवर्तन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.९,१० जुलै रोजी पुण्यातील अल्पबचत भवन येथे हे शिबीर उत्साहात पार पडले.
शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील,समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी,डॉ राम पुनयानी,डॉ. भालचंद्र कांगो,कॉ.अशोक ढवळे,आमदार हितेंद्र ठाकूर,श्रीपतराव शिंदे,भारत पाटणकर,डॉ.सुरेश माने,संजीव चांदोरकर,एड.असीम सरोदे,मेराज सिद्दिकी,विजय कुलकर्णी ,दत्ता देसाई,स्मिता पानसरे यांच्यासह मान्यवर नेत्यांनी,विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे स्वागतअध्यक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी स्वागत केले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील म्हणाले की, 'सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी गेल्या एक वर्षापासून राज्यातील छोटे पक्ष तसेच संघटना एकत्र आले आहे. जरी आमचे विचार वेगळे असले, मतभेद असले तरी आम्ही भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलो आहे. आमची ताकद कमी आहे. पण आम्ही विचारांचे पक्के आहोत. आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत. आमच्या विचारांचे जे पक्ष आहेत त्यांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. शरद पवार हतबल झाले आहेत असे मला वाटत नाही, शरद पवार हे शरद पवार आहेत, असे यावेळी भाई जयंत पाटील यांनी आलेल्या कार्यकर्ते यांना संबोधित करताना सांगितले.
स्वागतअध्यक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे व शिबिरार्थी यांचे आभार मानले.'भविष्यात प्रागतिक पक्ष एकत्र येउन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवणार असून संपूर्ण महाराष्ट्रात या प्रागतिक पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यानुसार मोर्चा,आंदोलन,शिबीर,तसेच विविध प्रकारचे राजकीय मेळावे घेऊन विरोधी पक्षाला आपली ताकद दाखवू,' असे नाथाभाऊ शेवाळे म्हणाले.
तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी म्हणाले, 'जेलमध्ये चक्की पिसायला लावू म्हणणारे आज सत्तेत आहेत. आज देशात महात्मा गांधी यांच्या आरोपीची मूर्ती बनविली जात आहे. तसेच हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील सरकार हे ईडीचे सरकार आहे. आज सत्तेच्या लालसेपोटी आणि भीतीपोटी विचार बदलत आहेत. येत्या 2024 ला राज्यात ईडी सरकार दिसणार नाही. शरद पवार हे देशातील एक मोठे नेते आहेत. एखादा मोर्चा जर भाजप विरोधी होणार असेल, तर आम्ही त्याला नक्की पाठिंबा देणार आहोत'
या कार्यक्रमात विविध विषयांवर आलेल्या मान्यवर व प्रमुख पाहुणे व्यक्ते यांनी शिबिरर्थी यांना मार्गदर्शन केले.या यामध्ये 'भारतीय संविधान व भाजपा आरएसएस यांचे षडयंत्र' याविषयी एड. असीम सरोदे तसेच बी आर एस पी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष एड.डॉ. सुरेश माने यांनी मार्गदर्शन केले. तर 'धर्मनिष्ठ राष्ट्रवाद आणि नफरत की राजनीति' याविषयी डॉ. राम पुणयानी व समाजवादी पार्टीचे प्रवक्ता मेराज सिद्दिकी यांनी मार्गदर्शन केले. तर 'कृषी क्षेत्रावर आरिष्टे आणि उपाय' याविषयी कॉ.अशोक ढवळे, मासवादी कम्युनिस्ट पार्टी यांनी मार्गदर्शन केले. तर 'आर्थिक औद्योगिक धोरणाची समीक्षा आणि उपाय' याविषयी संजीव चांदोरकर व लाल निशाण पक्षाचे विजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. ' दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्यांक समुदायावरील आव्हाने -उपाय' याविषयी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले यांनी मार्गदर्शन केले. तसेच 'प्रकल्प विस्थापित व गायरान जमीन व जमीन धारकांच्या पुनरसंरचनेचा प्रश्न' याविषयी कॉ. भारत पाटणकर श्रम मुक्ती दल व ऍड. डॉ.सुरेश माने बी आर एस पी संस्थापक अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले. 'वर्ग जाती स्त्रियांकरिता राजकीय सांस्कृतिक चळवळ' याविषयी दत्ता देसाई व कॉम्रेड स्मिता पानसरे भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी मार्गदर्शन केले. 'शिक्षण रोजगार आणि आरोग्य क्षेत्रातील आव्हाने' याविषयी कॉ. डॉ. भालचंद्र कांगो भाकपा यांनी मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: